
औरंगाबाद : संप मिटला तरीही फरपट
औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले. तथापि, औरंगाबाद सिडको आगार (क्र. २) मध्ये तब्बल अडीचशे ते तीनशे कर्मचाऱ्यांना काम मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ‘काम नाही तर दामही नाही’ यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार कायम आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून संप सुरु होता. संप सुरु असताना प्रशासनातर्फे वारंवार कामावर हजर होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. त्यातील काही कर्मचारी कामावर हजर झाले होते, तर अनेक कर्मचारी संपात ठाम होते.
अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर २२ एप्रिलरोजी संपातील उर्वरित सर्व कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र, हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना आता काम मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सिडको बसस्थानकात ३१४ चालक, २२६ वाहक आणि १३० चालक कम वाहक असे एकूण ६७० कर्मचारी आहेत. त्या तुलनेत केवळ ९० बस धावत आहेत, त्यामुळे दररोज ३८० कर्मचाऱ्यांना ड्युटी मिळत आहे. तर २९० कर्मचाऱ्यांना कामच मिळत नाही. ड्यूटी मिळेल म्हणून दररोज कर्मचारी आगारात येवून बसतात, मात्र काम मिळत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा घराकडे परतावे लागत आहे. एसटीचा संप मिटल्यापासून अनेक कर्मचाऱ्यांना आजपर्यंत एकदाही काम मिळालेले नाही. एसटीमध्ये काम नाही तर दाम नाही अशी पद्धत असल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार अद्यापही कायम आहे.
शहर बसचे कर्मचारी अतिरिक्त
महापालिकेमार्फत चालवली जाणारी स्मार्ट शहर बस ही एसटी महामंडळामार्फत चालवली जात होती. शहरात तब्बल शंभर बस सुरु करण्यात आल्या होत्या, ही बससेवा सुरु झाली, त्यावेळी एसटीकडे कर्मचारी कमी होते, त्यामुळे एसटीच्या विविध विभागातून कर्मचाऱ्यांच्या औरंगाबादेत बदल्या करण्यात आल्या होत्या. नुकताच मनपाने एसटी महामंडळासोबतचा करार मोडल्याने तब्बल २५० कर्मचारी सिडको आगारात अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची परिस्थिती ओढावली आहे.
Web Title: Two Hundred Fifty Employes Not Found Work In Aurangabad Cidco Depo
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..