Water Shortage : जायकवाडीतील उपसा घटला, हर्सूल तलावात साडेसहा फूट पाणी; जलसंकटाची छाया गडद

शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या जायकवाडी धरणातून पाणी उपसा घटला आहे. दुसरीकडे हर्सूल तलावातील पातळीही साडेसहा फुटांवर आली आहे.
Water Shortage
Water Shortage Sakal

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या जायकवाडी धरणातून पाणी उपसा घटला आहे. दुसरीकडे हर्सूल तलावातील पातळीही साडेसहा फुटांवर आली आहे. यामुळे शहरावर ‘जल संकटा’ची छाया गडद झाली आहे. यापुढे पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शहराला पूर्वी जायकवाडीपासून टाकण्यात आलेल्या ७०० आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या अशा दोन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यात आता ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून देखील पाणीपुरवठा केला जात आहे.

यामुळे आता या तीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दुसरीकडे जुन्या शहरातील १४ वॉर्डांना हर्सूल तलावातून पाणीपुरवठा केला जातो. ७०० आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून रोज १२० ते १२५ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो़, परंतु शहराला ११० एमएलडी पाणी मिळते.

यासह ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून २० ते २२ एमएलडी पाणी मिळत आहे. कालव्यांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने शहराच्या पाणी उपशात पाच ते सात एमएलडीची घट झाल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

यामुळे ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकूनही प्रत्यक्षात तेरा ते पंधरा एमएलडीच पाणी वाढले आहे. २८ फूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या हर्सूल तलावात देखील केवळ साडेसहा फूट पाणीसाठा आहे.

तलवातील पाणीपातळीत घट झाल्याने बारा ते तेरा एमएलडी पाणी अपेक्षित असताना, जुन्या जलशुद्धीकरण केंद्रातून दोन तर नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाच एमएलडी असे एकूण सात एमएलडी पाणी सध्या उपलब्ध होत आहे. जायकवाडी आणि हर्सूल या दोन्हीचीही पाणीपातळी घटत असल्याने शहर जलसंकटाच्या छायेत असल्याचे मानले जाते.

फारोळ्यातील यंत्रणा पडतेय कमी

नवीन ९०० मिलिमीटरच्या जलवाहिनीतून सध्या २५ एमएलडीपर्यंत पाणी वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु तेवढे पाणी शुद्ध करण्यासाठी फारोळा येथील जलशुद्धीकरण यंत्रणा कमी पडत आहे. परिणामी नवीन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत पाण्याचा उपसा वाढवणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्या केंद्राचे काम कासवगतीने

९०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीमुळे ५० एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा वाढवला जाणार आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी फारोळ्यात जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नवीन २७ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. मात्र या कामाची गती मंदावली असल्याचे बोलले जाते. सध्या केला जातो यापेक्षा अधिक पाणीपुरवठा वाढवल्यास शहराला गढूळ पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाची अडचण वाढल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com