औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य २५०० मिलिमिटर व्यासाच्या पाईप लाइनचे काम पाडव्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यासाठी पाइप तयार करण्याचे काम जोरात सुरू असून, तीन हजार टन स्टील आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२० पासून सुरू आहे. यातील मुख्य काम म्हणजे जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत २५०० मिलिमीटर व्यासाची मुख्य पाइपलाइन टाकण्याचे आहे. ही लाईन ३९ किलोमीटरची असेल. बंद पडलेल्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे काम करताना सुरुवातीला शहरातील अंतर्गत पाइपलाइनची कामे करण्यात आली. त्यावेळी मुख्य पाइपलाईनचे काम करून घेतले असते तर शहरावर आजसारखे पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे नव्या योजनेत तरी मुख्य पाइपलाईनचे काम प्राधान्याने सुरु करावे, अशी मागणी होत आहे. त्यानुसार पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक एप्रिलपासून मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाइप तयार केले जात आहेत. कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने पाइप निर्मितीचा कारखाना नक्षत्रवाडी येथेच सुरू केला आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता पाइपची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार टन स्टील कारखान्याच्या साइटवर आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. काही प्रमाणात पाईप तयार झाल्यानंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला गुढी पाडव्यापासून सुरुवात होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.