मधुकर कांबळे
World Meteorological Day : तीनही ऋतूंचे वेळापत्रक बिघडले. कधी पावसाळा लांबतो तर कधी हिवाळा कमी होतो. यंदा थंडीचे दिवस कमी राहिले. पर्यायाने उन्ह तापायला लवकर सुरवात झाली. मार्चमध्येच तापमानात वाढ होत असल्याने मार्चच्या मध्यातच अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
हिवाळा साधारणतः दसऱ्यापासून सुरू होतो. दात कडकड करायला लावणारी थंडी दिवाळीपासून जाणवते. पण, यंदा डिसेंबरच्या शेवटी-शेवटी कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आणि लगेच फेब्रुवारीपासून उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली. म्हणजेच थंडीचे दिवस कमी झाले आणि ते दिवस उन्हाळ्यात रूपांतरित झाले. परिणामी, यंदा उन्हाळा दीर्घ आहे.
एकंदरीत पृथ्वीवरील पर्वते, पठारे, मैदाने, नद्या, समुद्रकिनारे, समुद्रतळ, समुद्राचे पृष्ठभागीय तापमान यामध्ये वैविध्य दिसून येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आज बदल दिसून येत आहे. यामुळे मानवी जीवन, आर्थिक क्रिया, भौतिक घटक, औद्योगिक आदी सर्वच घटकांवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी वृक्ष लागवड, माती संवर्धन, हवा संवर्धनाची आणि मानवी गरजांवर नियंत्रण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तापमान वाढीला हवेतील प्रदूषण सर्वाधिक हातभार लावत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी यांनी सांगितले, ‘‘तापमानवाढ होण्यात औद्योगिक प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. प्रदूषणामुळे ओझोनचा थर विरळ होऊन त्यातून सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायलेट किरणे सरळ भूपृष्ठावर येतात. त्यातून प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवायला सुरवात होते. वाहनांतून निघणारा धूरही याला कारण आहे.’’
चिकलठाणा मौसम विज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी राजेशकुमार यांनी सांगितले, ‘‘गेल्या पाच वर्षांत २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगरचे तापमान सर्वाधिक होते. २०१९ मध्ये २९ मार्चला ४१.२ डिग्री सेल्सिअस, २८ एप्रिलला ४३.६, ३१ मे रोजी ४२.८ आणि २ जूनला ४३ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते.
वर्ष २०२० मध्ये २४ मार्चला ३७.९, १६ एप्रिल ४०.८, २६ मे ४२.५ डिग्री सेल्सिअस. वर्ष २०२१ मध्ये २९ मार्चला ३९.७, २८ एप्रिलला ४०.६, १० मे रोजी ३९.८ डिग्री सेल्सिअस. वर्ष २०२२ मध्ये २८ व २९ मार्च ४२.४, ९ मे ४३.२ आणि वर्ष २०२३ मध्ये २९ मार्च ३६.३, १९ एप्रिल ४०.३, १३ मे ४१.८ आणि यंदा ११ मार्चला ३६ डिग्री सेल्सिअस एवढे दिवस सर्वाधिक तापमान नोंद झाले.’’
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घरापुढे किमान दोन झाडे लावावी लागतील आणि ती जगवावी लागतील. शाळेतून परिसर अभ्यास अध्ययनातून निसर्गाचे महत्त्व सांगण्यावर भर द्यावा लागेल. युवकांच्या माध्यमातून हवा व हवामान आणि पर्यावरणाचे जनजागरण करण्याची गरज आहे.
डॉ. मदन सूर्यवंशी (भूगोल विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
ग्लोबल वॉर्मिंगचे छत्रपती संभाजीनगरला आजच्यास्थितीत तरी नुकसान नाही. मात्र, उन्हाचा पारा ४० च्या पुढे जाणे म्हणजे आपण तापमानवाढीच्या उंबरठ्यावर आहोत. यासाठी आतापासूनच प्रत्येक व्यक्ती व संस्थांनी सतर्क होण्याची व झाडे लावून ती जगवण्याची गरज आहे.
- राजेशकुमार, प्रभारी अधिकारी, (चिकलठाणा मौसम विज्ञान विभाग)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.