Lockdown : लातुरकरांनो, चालत जाऊनच आणा किराणा अन् भाजीपाला

Ban on Vehicle use at Latur
Ban on Vehicle use at Latur
Updated on

लातूर  : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाउनचा मंगळवारपासून (ता. २१) दुसरा टप्पा सुरू होत आहे. यातही वाहन वापरावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला व अन्य वस्तूंची खरेदी लोकांनी चालत किंवा सायकलवर जाऊन करावी, असे बंधन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता. २०) काढलेल्या आदेशात घातले आहे. छत्रीचा वापर केल्यास फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास मदत होईल, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे. 

जिल्ह्यात १५ जुलैपासून पंधरा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील कडक लॉकडाउन सोमवारी संपत आहे. २१ ते ३० जुलैदरम्यान दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली असली, तरी आणखी काही गोष्टी स्पष्ट करीत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार बाजारपेठेतील किराणा, भाजीपाला, बेकरी व फळांची दुकाने सकाळी सात ते दुपारी बारादरम्यान सुरू राहणार आहे. या सर्वांची खरेदी लोकांना चालत जाऊन किंवा सायकलचा वापर करूनच करावी लागणार आहे.

भाजीपाला व फळांची विक्री विक्रेत्यांना फिरून करता येणार नाही. दुकानांतून त्यांना विक्री करावी लागणार आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी जवळच्या दुकानात जाण्याचे आवाहन श्रीकांत यांनी आदेशातून केले आहे. दुकानात प्रवेश देऊन विक्री होणारे सुपर मार्केट्स व बिग बझार बंद राहणार असून, त्यांना ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून आलेल्या ऑर्डरनुसार ग्राहकांना घरपोच साहित्य वितरित करता येणार आहे. घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तींना गणवेश व ओळखपत्रांचे बंधन घालण्यात आले आहे. किरकोळ विक्रेत्यांना ठोक विक्रेत्यांकडून किराणा, भाजीपाला, बेकरी साहित्य व फळांची खरेदी सकाळी नऊपर्यंतच करता येणार आहे. या ठिकाणी नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग
 
यासाठी आणखी शिथिलता 
मटण, चिकन व अंडी विक्रीची दुकाने सकाळी सात दुपारी बारा, तर शिवभोजन थाळीची पार्सल सेवा दुपारी एकपर्यंत सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेशी निगडित नसलेली कारखाने व उद्योग कामाच्या ठिकाणी मजुरांची निवास व भोजनाची व्यवस्था असेल तरच सुरू ठेवता येणार आहेत. जार व टँकरने पाणीपुरवठा दुपारी बारापर्यंत सुरू राहणार आहे. ऑटोरिक्षा केवळ किराणा किंवा इतर मालाच्या वाहतुकीसाठी दुपारी बारापर्यंत सुरू राहणार असून, त्यातून प्रवासी वाहतूक करण्यावर बंदी राहील. इंटरनेटसारख्या संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणाऱ्या संस्था आवश्यकतेनुसार सुरू ठेवता येणार असून, वाहनांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर सुरू ठेवता येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

(संपादन : विकास देशमुख)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com