बॅंक कर्मचाऱ्यांचे काम 4 लाख 32 हजार तास!

बॅंक कर्मचाऱ्यांचे काम 4 लाख 32 हजार तास!

औरंगाबाद - हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून 10 नोव्हेंबरला बॅंका सुरू करण्यात आल्या. मागील गुरुवारपासून ते या गुरुवारपर्यंत (ता. 17) बॅंकांच्या कामकाजाचा सहावा दिवस होता. यादरम्यान केवळ गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी (ता. 14) बॅंका बंद होत्या. बॅंकांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी सहा दिवसांत सहा हजार बॅंक कर्मचाऱ्यांनी कामकाजासाठी तब्बल चार लाख 32 हजार तास दिल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात चारशे राष्ट्रीयीकृत, तर अडीचशे ग्रामीण, सहकारी, पतपेढ्या वर्गातील बॅंका आहेत. या बॅंकांमध्ये सरव्यवस्थापकापासून उपसरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, शाखाधिकारी, कॅशिअर, लिपिक आणि शिपाई आदी मिळून तब्बल सहा हजार कर्मचारी काम करतात. केंद्राने हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार (ता. 9) आणि सोमवार (ता. 14) वगळता सहा दिवस बॅंकांचे कामकाज बारा ते अठरा तासांपर्यंत सुरू आहे. जितकी अधिक जबाबदारी तितका अधिक बॅंकेसाठी वेळ, हे सूत्रच बॅंकिंगमध्ये आहे. यादरम्यान हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देणे, जमा करून घेणे, धनादेश स्वीकारणे, एनईएफटी, आरटीजीएस, डिमांड ड्राफ्ट आदी कामांसाठी सहा हजार कर्मचाऱ्यांनी तब्बल चार लाख 32 हजार तास वेळ दिला. प्रामुख्याने पैसे भरणा करणाऱ्यांचा ओघ अधिक असल्याने बॅंकांत मोठ्या प्रमाणात रोख रक्‍कम आली. बॅंक अधिकाऱ्यांतर्फे या नोटांचे हिशेब लावण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरुच होते. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांनीसुद्धा वेळ, कुटुंबाची जबाबदारी बाजूला सारून काम केले.

1000 नवीन खाती
हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यापासून बहुतांश बॅंकांना एक्‍स्चेंज सेंटरचे स्वरूप आले होते. त्यामुळे बॅंका मूळ कामापासून दूर जात होत्या. मात्र, मंगळवारपासून भरणा करणाऱ्यांची गर्दी ओसरल्याने बॅंकांनी बुधवारपासून काही प्रमाणात आपापले मूळ काम सुरु केले. त्यामुळे बुधवारी राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये तब्बल 1000 नवी खाती उघडली असावी, असा अंदाज आहे. नव्या खात्यात हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटाही दाखल होण्यास सुरवात झालेली आहे.

(आकडेवारी बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार)
औरंगाबादमधील
बॅंकांची स्थिती
----------
राष्ट्रीयीकृत व खासगी : ग्रामीण - 93, निमशहरी - 57, शहर - 137
औरंगाबाद जिल्हा बॅंक : 138 शाखा
उर्वरित सर्व बॅंका अंदाजे : 250 शाखा
खातेधारकांची संख्या : शहर ः 8 लाख ः ग्रामीण ः सव्वादोन लाख

सहा दिवसांतील व्यवहार
भरणा : शहर - 1800 कोटी, ग्रामीण - 400 कोटी ः एकूण 2200 कोटी
काढणे : शहर 400 कोटी, ग्रामीण - 100 कोटी ः एकूण 500 कोटी
प्राप्त धनादेश : 12,000
एनईएफटी, आरटीजीएस : 10,000

""हजार-पाचशे रुपयांच्या नोटा रद्द झाल्यावर बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले सर्व नियोजन रद्द करून 100 टक्‍के लक्ष बॅंकेच्या कामकाजाकडे दिले. हे यश बॅंक कर्मचाऱ्यांमुळेच शक्‍य झाले. आता हळूहळू कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होत आहे. मात्र, लोकांकडून बदलून घेतलेल्या नोटा काही नागरिकांकडून चलनात आणण्याऐवजी साठवून ठेवल्या जात आहेत. त्यामुळे इतरांना याचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांनी जेवढी आवश्‍यकता असेल, तितक्‍याच नोटा घ्याव्यात. तीस डिसेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत असल्याने बॅंकांमध्ये उगाच गर्दी करण्याचे कारण नाही.''
- रवी धामणगावकर, उपमहासचिव, एसबीएच स्टाफ असोसिएशन, औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com