अस्वलाने तोडले शेतकऱ्याच्या कानाचे लचके 

photo
photo

नांदेड : माहूर, किनवट तालुक्यातील जंगलक्षेत्रात शेतकऱ्यांवर हिंस्त्र पशुंच्या हल्ल्यात वाढ होत आहे. मंगळवारी (ता.१४) रब्बी पिकांना पाणी सोडून पहाटे घरी परतणाऱ्या सिंदगी-मोहपूर (ता. किनवट) येथील शेतकऱ्यावर पिल्लांसह दबा धरुन बसलेल्या मादी अस्वलाने हल्ला चढवला. हल्लेखोर अस्वलाने शेतकऱ्याच्या कानाचे लचके तोडले. जखमी शेतकऱ्याने आरडा- ओरड केल्याने हल्लेखोर अस्वल पसार झाल्याने पुढील अनर्थ टळला. जखमी दत्ता वानखेडे यांच्यावर तेलंगणातील आदिलाबाद येथील रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. 

सिंदगी (मोहपूर) येथील दत्ता प्रभू वानखेडे (वय ३०) यांचे मोहपूर शिवारातील मालकीचे शेत आहे. सोमवारी (ता.१३) दिवसभर विजेचे भारनियमन असल्यामुळे रात्री रब्बीच्या पिकाला पाणी देण्यासाठी दत्ता वानखेडे शेतात गेले. पिकांना पाणी देवून झाल्यानंतर त्यांनी जागलीवरच विसावा घेतला. मंगळवारी पहाटे घराकडे परतताना सिंदगी गावाजवळ पिल्लांसह दबा धरुण बसलेल्या मादी अस्वलाने पाठीमागून दत्ता वानखेडे यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोर अस्वलाने वानखेडे यांच्या दोन्ही हाता-पायांना चावा घेत कानाचे लचके तोडले. जखमी अवस्थेत दत्ता वानखेडे यांच्या आरडा-ओरडीमुळे सुदैवाने हल्लेखोर अस्वल पिलांसह पसार झाले. जखमी अवस्थेतील श्री. वानखेडे यांना तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तेलंगणाच्या आदिलाबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. 

जखमी शेतकऱ्यास आर्थीक मदत 
अस्वलाच्या हल्याची माहिती मिळताच वनपाल एस. एम. यादव, के. जी. गायकवाड, वनरक्षक एस.जी. घोरबांड, आर. बी. दांडेगांवकर यांनी जखमी श्री. वानखेडे यांना उपचारासाठी पाच हजार रुपयाची रोख रक्कमेची मदत देवून घटनास्थळाचा पंचनामा केला.

भारनियमन रद्द करा- आमदार श्री. केराम   
हिंस्त्र पशुंच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर किनवट व माहूर तालुक्यातील भारनियमन त्वरीत रद्द करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने किनवट, माहूर हे तालुके अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त घोषीत केले आहेत. दोन्ही तालुक्यात डोंगर, जंगलांचे प्रमाण जास्त आहे. जंगलक्षेत्रात वाघ, अस्वल, रानडुक्कर आदी हिंस्त्र पशुंचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. आनेक शेतकरी जागली (आखाडा) करुन शेतात राहतात. दिवसाच्या भारनियमनामुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शिवारातच मुक्काम ठोकावा लागतो. जंगलक्षेत्रात आनेक शेतकऱ्यांना हिंस्त्र पशुंच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. शेतकऱ्यांवर हिस्त्र वन्यजीवंच्या हल्ल्यात वाढ होत असताना नक्षलप्रवण, आदिवासीक्षेत्राच्या दोन्ही तालुक्यात दिवस, रात्रीचे भानियमन सुरु आहे. विजतरण कंपनीस तत्काळ भारनियमन बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com