साडेसहा लाख शेतकरी राहणार रेशनच्या धान्यापासून वंचित

साडेसहा लाख शेतकरी राहणार रेशनच्या धान्यापासून वंचित

बीड - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली अन्नसुरक्षा योजना बंद करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. यामुळे दारिद्र्य रेषेच्यावर असलेल्या बीड जिल्ह्यातील सहा लाख ४२ हजार शेतकऱ्यांना नववर्षापासून सवलतीच्या दराने मिळणारे धान्य बंद होणार आहे. 

राज्यात दुष्काळाच्या काळात १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शासनाने अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करीत तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू या सवलतीच्या दराने एका कुटुंबाला प्रतिमहिना जास्तीत जास्त २५ किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते. गेल्या पाच वर्षांपासून बीड जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार ४४२ शेतकरी कुटुंबांतील सहा लाख ४२ हजार ५७७ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत होता. मात्र, गतवर्षी व त्यानंतर यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे व पीक परिस्थिती बरी असल्याने सरकारने यासाठीचे अनुदान बंद करीत योजनेचे निकष बदलले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सवलतीच्या दरातील धान्य बंद करण्यात येणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांना वगळण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील रेशन लाभार्थींची संख्या निम्म्याने घटणार असून, धान्याचा जिल्ह्याचा कोटाही निम्म्यापेक्षा अधिकने कमी होणार आहे. परिणामी, एकीकडे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारची बचत होणार असली तरी दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवरच सवलतीच्या दरातील धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

४.१० लाख कार्डधारकांनाच लाभ 
जिल्ह्यातील साडेसहा लाख एपीएल शेतकऱ्यांचे धान्य नववर्षापासून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थींनाच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील ४० हजार ७७६, प्राधान्य कुटुंब लाभार्थींमध्ये तीन लाख ७६ हजार ४३८, तर अन्नपूर्णा योजनेतील दोन हजार ५१८ अशा एकूण चार लाख १० हजार ७३२ कार्डधारकांनाच यापुढे अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. 

साखर, केरोसीन अन्‌ आता धान्यही गेले
सरकारने गेल्या काही वर्षांत सातत्याने रेशनच्या अन्न-धान्याच्या कोट्यात कपात करण्याचे धोरण राबविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्नसुरक्षा योजनेपूर्वी जुन्या रेशन वाटप प्रणालीत अगोदर एपीएल धारकांची साखर बंद करण्यात आली. यानंतर सुरवातीला दोन गॅस जोडणी असणाऱ्यांचे व नंतर एक गॅस जोडणी असणाऱ्यांचेही केरोसीन बंद करण्यात आले. यानंतर रेशनवर अधूनमधून सणावाराला मिळणारी तूरडाळ व तेलपुडेही बंद करण्यात आले. नंतर यावर मोठा गाजावाजा करून केंद्र शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेत सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रेशनसाठीच्या पात्रता निकषांमध्येच बदल करीत एपीएल धारकांना यातून सरसकट वगळण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com