नांदेड जिल्ह्यात  कोट्यावधींचे नुकसान

फोटो
फोटो

नांदेड :  जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक, अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात बाधित झालेल्या सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी संयुक्त अहवालाद्वारे केली आहे. यामुळे राज्यातील काळजीवाहू शासन कोणत्या निकषानुसार मदत देण्यार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरिपाचा घास हिरावून घेतला. जून, जुलै व आॅगस्टमध्ये काहीसा कमी बरसलेल्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यातील सरासरी ७२.६२ मिलिमीटर पर्जन्यमान असताना यंदा २८४ टक्क्यांनुसार २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह कपाशी व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अहवाल शासनाला सादर
या बाबत शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले. या पंचनामाचा अंतिम अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शनिवारी (ता. नऊ) प्राप्त झाला. यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे व श्री. चलवदे यांनी हा अहवाल शासनाला सादर करून ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित निकषानुसार ४३० कोटी रुपयांची मागणी केली.

साडेसहा लाख हेक्टरचे नुकसान
जिल्ह्यात आठ लाख ७८ हजार ३८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी यंदा आठ लाख तीन हजार ५१० हेक्टरवर पेरणी झाली होती. या पेरणी क्षेत्रापैकी तब्बल सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात कोरडवाहू क्षेत्राचे सहा लाख ४८ हजार ७८, बागायती ६१ व बहुवार्षिक फळपिकांचा १७७ हेक्टरचा समावेश आहे. अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान जिरायती पीक असलेल्या सोयाबीनचे तीन लाख ७५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर पांढरे सोने असलेल्या कपाशीचे दोन लाख चार हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारीचे ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर १२ हजार ५७४ हेक्टर, मूग एक हजार २२३ हेक्टर व इतर पिकांचे चार हजार सहा हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. तर बागायती पिकांमध्ये भाजीपाला पिकांचे ५९ हेक्टर, केळी, असे एकूण ६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये सात हेक्टर मोसंबी, चिकू तीन हेक्टर व इतर १५६ फळपिके, असे एकूण १७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

‘एनडीआरएफ’नुसार भरपाईची मागणी
जिल्ह्यात नुकसानीचा फटका सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना बसला. यावरून जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख ८० हजार तीनशे रुपयांची मागणी केली आहे. यात कोरडवाहूसाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार आठशे, बागायतीसाठी आठ लाख २३ हजार पाचशे रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी ३१ लाख ८६ हजार रुपयांची मागणी केली आहे. यामध्ये काेरडवाहूसाठी हेक्टरी सहा हजार आठशे, बागायतीसाठी १३ हजार पाचशे व बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येते. ही मदत दोन हेक्टरपर्यंत देण्याचा शासन आदेश आहे.

नव्या की जुन्या आदेशाने मिळणार मदत
महसूल व वन विभागाच्या (ता. ११) सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार जुलै ते ऑगस्‍ट व सप्‍टेंबर ते ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्‍टी व पुरामुळे शेतीपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पिकासाठी घेतलेल्‍या एक हेक्टरपर्यंतची पीककर्ज माफी. तसेच पीककर्ज न घेतलेल्‍या शेतकऱ्यांना एक हेक्‍टरच्‍या मर्यादेत ‘एनडीआरएफ’ मदतीचच्‍या तिप्‍पट दराने मदत देण्‍याचा निर्णय शासनाने नुकत्याच झालेल्या कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घेण्‍यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे बाधा पोचल्यामुळे राज्यातील काळजीवाहू सरकार कोणत्या निकषानुसार मदत देईल, का जुन्या निकषाच्या आधारवर मदतीची बोळवण करणार, हे काही दिवसांत कळणार आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अंतिम क्षेत्राची माहिती शनिवारी शासनाकडे पाठविली. यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ४३० कोटींची मागणी केली आहे.
- अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी, नांदेड.

जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका पावणेचार लाख हेक्टरवरील सोयाबीनला बसला आहे. तसेच दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनाकडे अंतिम अहवाल पाठविला आहे.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com