औरंगाबाद महापालिकेत ब्रेक अपची तयारी...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद- महापालिकेची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार असली, तरी डिसेंबरच्या थंडीतच शहरातील राजकारण पेटले आहे. राज्यात युती संपुष्टात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत भाजपने शिवसेनेची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याची चाचपणी सुरू केली आहे. उपमहापौरांच्या राजीनामा नाट्यानंतर भाजपचे 23 व भाजपसोबत असलेले आठ अपक्ष नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत; मात्र त्यापूर्वी महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शुक्रवारी (ता. 13) केली. 

बजेट नव्हे, रंगले राजकारण
महापालिकेचे बजेट डिसेंबर महिना सुरू झाला तरी अंतिम झालेले नाही. त्यामुळे महापौरांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती; मात्र या सभेत बजेटऐवजी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण रंगले. सभेला सुरवात होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवण्यात आला. मात्र, भाजपने शिवसेनेवर बाण सोडत त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने देखील प्रत्युत्तराची एकही संधी सोडली नाही. त्यात भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला.

आधी महापाैरांनी राजीनामा द्यावा

उपमहापौरांच्या राजीमान्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी महापालिकेत दाखल झाले. पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, की उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेला राजीनामा सभागृहात अचानक घडलेला प्रकार आहे. पक्षाने यासंदर्भात कुठलेही आदेश दिलेले नव्हते. राजीनामा महापौरांकडे देणे गरजेचे होते; मात्र वरिष्ठ नगरसेवकांच्या हे लक्षात का आले नाही, हे त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच कळेल. आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर श्री. औताडे पुन्हा उपमहापौरांच्या खुर्चीत बसू शकतात असा दावाही त्यांनी केला. 
दरम्यान, शिवसेना-भाजप युती आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे भाजपच्या 23 नगरसेवकांसह सोबत असलेल्या आठ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे; मात्र महापौर युतीचे असल्यामुळे आधी त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर आमचे नगरसेवक राजीनामा देतील, असे तनवाणी म्हणाले. 

आम्ही महापालिकेत समर्थ 
शहराध्यक्ष तनवाणी यांनी 2104 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते शहराध्यक्ष झाले; मात्र भाजपमधील जुने व नवे असा वाद लागला. तो अद्याप संपलेला नाही. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी दोन अर्ज भरण्यात आले होते. वर्णी मात्र तनवाणी समर्थक जयश्री कुलकर्णी यांची लागली. दरम्यान, शुक्रवारी उपमहापौरांच्या राजीनाम्याबाबत तनवाणी अनभिज्ञ होते. आपल्याला विश्‍वासात घेऊन निर्णय घेतले जात नाहीत का? असा प्रश्‍न केला असता, तसे नसल्याचे उत्तर दिले; मात्र माजी सभापती दिलीप थोरात यांनी महापालिकेत निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com