औरंगाबाद - मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगत नोकरीची आस धरलेल्या बेरोजगारांना नकली नियुक्तिपत्र देऊन फसवणूक करण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. कर्मचारी नियुक्तीची आपली स्वतंत्र प्रणाली असलेल्या येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांना या "बनावटबाबूं'चा जाच सोसावा लागत आहे.
औद्योगिक नगरी असलेल्या औरंगाबादेत 200 च्या आसपास बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या कंपन्यांना नोकरभरती करायची असल्यास रीतसर जाहिरात काढून जागा भरण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबविली जाते. मात्र, याची कल्पना नसलेले अनेक तरुण नकली कन्सल्टन्सींच्या आमिषांना बळी पडताना दिसतात. नकली संस्थांचा डोलारा दाखवून एखाद्या तरुणाला बहुराष्ट्रीय कंपनीचे नियुक्तिपत्र देतो म्हणून सांगितले जाते; परंतु तो तरुण कंपनीत गेल्यास त्याला कंपनीतून माघारी पाठवल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येते. सध्या औरंगाबाद आणि परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील बड्या कंपन्यांना याचा त्रास सोसावा लागत आहेच; त्यात अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.
मोठ्या कंपन्यांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यास संबंधित कंपनीशी संपर्क साधूनच नोकरीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. कोणतीही मोठी कंपनी त्रयस्थांमार्फत नियुक्ती करीत नाही. याबाबतीत तरुणांनी कोणाशीही आर्थिक व्यवहार न करता आधी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.
- श्रीकांत नवले, निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
|