दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची पुस्तके

File photo
File photo

उस्मानाबाद : बळीराजा चेतना अभियानामध्ये शेतकऱ्यांना चक्क स्ट्रॉबेरीची माहिती असणारी पुस्तके वाटप करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची माहिती असणारी पुस्तके वाटप केल्याचा प्रशासनाच्या दाव्याची चांगलीच भंबेरी उडाली असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोणाचीही तक्रार नसताना चौकशीचे नाटक कशासाठी केले जात आहे? असा प्रश्‍न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. 

जिल्ह्यात वर्षभर वातावरण साधारणपणे उष्ण असते. जेमतेम सरासरी ७५० मिलीमीटर पाऊस पडतो. उष्ण वातावरणामुळे खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन तर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा पिके घेतली जातात. उष्ण वातावरण असल्याने स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. जरी लागवड केली तरी पूरक बाजारपेठही येथे उपलब्ध नाही. त्यामुळे पुणे, मुंबई अशा ठिकाणीच स्ट्रॉबेरीची विक्री करावी लागते. महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण असून त्याच परिसरात स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे पिकते. शिवाय थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातूनही पर्यटक तेथे येतात. त्यामुळे चवदार स्ट्रॉबेरीची चवही पर्यटक घेतात, पर्यायाने बाजारपेठ मिळते.

उष्ण वातावरणात स्ट्रॉबेरीची लागवड केली तरी त्यातून उत्पन्न मिळत नाही. मात्र प्रशासनाला उष्ण प्रदेशातही स्ट्रॉबेरी लागवड होऊ शकते, असा साक्षात्कार झाला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची माहिती असणारी पुस्तके वाटप केली असल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे. स्‍ट्रॉबेरीची पुस्तके जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय कोणी घेतला. पुस्तके खरेदी करीत असताना कृषी विभागाचा सल्ला घेतला होता का? असे प्रश्‍न शेतकरी वर्गातून विचारले जात आहेत. 

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

चौकशीचा फार्स कशासाठी? 
पुस्तके खरेदीची आर्डर दिल्यानंतर तात्काळ पुस्तके मिळणे अपेक्षित होते. आता पुस्तके मिळालेत की नाही, याची कसलीच माहिती प्रशासनाकडे नाही. अनेक शेतकऱ्यांना पुस्तेक वाटप केल्याचा दावा खासगीमध्ये काही अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात किती पुस्तके जिल्ह्यात आली अन किती वाटप केली, याचे रेकार्ड दिसत नाही. त्यामुळे ही शासनाची फसवेगिरी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यामध्ये फसवणुकीचा गुन्हा करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com