कोरोनाला ‘परिवर्तन एक्सप्रेस’ लावणार ब्रेक

pariwartan express
pariwartan express

हिंगोली : जिल्‍ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्‍ज झाली असून ‘परिवर्तन एक्सप्रेस’ व्हॅनद्वारे गावनिहाय आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे. आता सारी आजाराचेदेखील २१ गावांत सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी काटेकोरपणे नियोजन करून तालुका आरोग्य अधिकारी, समूदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्या साहाय्याने २० हजार ५१४ नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

२१ गावांत ‘सारी’ आजाराचे सर्वेक्षण

यामध्ये काही लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले. तसेच आरोग्य यंत्रणा २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी केली. आता जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांमार्फेत २१ गावांत ‘सारी’ आजाराचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागामार्फत ‘परिवर्तन एक्सप्रेस’

डॉ. गणेश जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून संपूर्ण अहवाल तयार केला जात आहे. अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविकांना झूम ॲपद्वारे कोरोना आजाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गावोगाव प्रसिद्धी साहित्याचा पुरवठा करण्यात आला असून आरोग्य विभागामार्फत ‘परिवर्तन एक्सप्रेस’ व्हॅनद्वारे प्रसिद्धी व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन 

 व्हॅनद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार जिल्ह्यात दौरे करीत मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा रुग्णालयात डॉ. भालेराव व श्री. पठाण यांचे पथक मेहनत घेत असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

साडेबारा हजार बालकांची तपासणी

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागातर्फे बुधवारपर्यंत (ता. १५) जिल्‍ह्यातील १२ हजार ७९९ अंगणवाडी बालकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली. जिल्ह्यात विविध विभागांतर्गत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

एक हजार ८९ अंगणवाड्या

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंगणवाडी बालकांची तपासणी करण्यात यावी, असे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ८९ अंगणवाड्यांतील तीन वर्षांपर्यंतच्या ४७ हजार २५७ पैकी १२ हजार ७९९ बालकांची तपासणी करण्यात आली. साधारण खोकला, ताप असलेल्या बालकांना जवळच्या आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्रात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती श्री. वाघ यांनी दिली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com