नांदेडचा व्यावसायिक पोहोचला सातासमुद्रापार

File photo
File photo

नांदेड : एखाद्या व्यक्तीने ठरवले तर तो काय करू शकत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नांदेडचे श्रीकांत बाहेती. बाहेती यांच्याकडे कुठलेही पाठबळ नसताना त्यांनी काही वर्षापूर्वी पैशांची उसनवारी करून फुलांचा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला पण ते डगमगले नाहीत. नांदेडपासून सुरू केलेला फुलांचा हा व्यवसाय देशातील २७ मोठ्या शहरात सुरू असून यात अगदी चॉकलेटपासून ते केक, फुले, पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग साहित्यापर्यंत सर्व काही अगदी वेळेत १९६ देशात पोहचविले जाते.

असा बहरला फुलांचा व्यवसाय
नांदेड येथील श्रीकांत बाहेती हे वयाच्या दहाव्या वर्षापासून लहान मोठ्या व्यवसायात अगदी मन लावून काम करतात. यामुळे त्यांच्या प्रत्येक कामात पारदर्शकता आणि निटनेटकेपणा असायचा. त्यांच्या या गुण कौशल्याने ते नेहमीच चर्चेत असत. मागील दहा वर्षापासून त्यांनी शहरात वातानुकुलित फुलांची दुकान उघडली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. एवढेच नाहीतर त्यांच्या या जिद्दीचे नांदेडकरांना नवलही वाटायला लागले. परंतु, कुणाचीही पर्वा न करता श्री. श्रीकांत यांनी आपले काम चालुच ठेवले. बघता बघता त्यांचा हा व्यवसाय शहरासह महाराष्ट्रातील लातूर, परभणी, संगमनेर, विदर्भ आणि हैदराबाद सारख्या जवळपास २७ मोठ्या शहरात विस्तारला. इतकेच नव्हे तर आज त्यांचा हा व्यवसाय १९६ देशात पसरला आहे. अगदी चॉकलेटपासून ते विविध प्रकारचे देशी विदेशी फुले, पुष्पगुच्छ, ग्रिटींग कार्ड, विविध फुले हवे त्या ठिकाणी हवे त्या वेळेत अगदी न चुकता वेळेत पोहचविले जाते. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केलेली आहे.  

अशी झाली व्यवसायाला सुरुवात
मुळचे अकोले ( ता. संगमनेर,जि. अहमदनगर) येथील श्रीकांत बाहेती. त्यांचा बग्याजचा (ऊसाचा भुसा) मुळ व्यवसाय. आत्याभावासोबत ते हा व्यवसाय करत. मराठवाडा आणि विदर्भात काम करण्यासाठी नांदेड हे सेंटर निवडले. २००१मध्ये नांदेडला आलेत. कालांतराने आत्याभावाच्या या व्यवसायातून बाहेर पडून काही तरी वेगळा व्यवसाय सुरु करावा असा त्यांनी निश्‍चय केला. या व्यवसायाकडे का वळालो, याचे श्रीकांत बाहेती यांनी रहस्य सांगितले. ‘‘एकेदिवशी आई शशिकला व मी शिवाजीनगर येथील एका फुलाच्या दुकानात हार घ्यायला गेलो. तेव्हा विक्रेता जेवण करत होता. आम्ही हार मागितल्यावर त्याने कागदाला हात पुसून आम्हाला हार दिला. आईला ते आवडले नसल्याने हार फेकून दिला. आणि म्हणाली की, स्वच्छ हार मिळेल यासाठी काही तर कर. तेव्हाच डोक्यात बसलं की, फुलांचे दुकान टाकावे. शिवाजीनगर येथेच गाळा खरेदी केला. कारागीरांचा शोध घेऊन फुलांचा हा व्यवसाय सुरु केला. बेंगलोर, पुणे, सातार, नगर आदी जिल्ह्यांतून फुले मागवून ही फुले परदेशात पाठत असल्याचे श्री. बाहेती यांनी सांगितले.

चीनला निघालेली फुलांची जहाज बुडाली
चीन येथुन फुले घेवुन निघालेली बोट समुद्राच्या वादळात बुडाली. त्यात माझ्या फुलांचे कंटेनर वाहून गेले. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले. त्यानंतर माझा व्यवसाय डबघाईस आला. ज्यांच्याकडून मी पैसे घेतले होते त्यांना प्रामाणिकपणे घडलेला प्रकार सांगितला. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवुन मला वेळ दिला. मला वाटत की व्यवसायात विश्वास खुप महत्त्वाचा आहे. विश्वासावर अनेक कामे होत असतात.

आधुनिकतेची जोड
फुलांच्या व्यवसायात अनुभव नव्हता, म्हणून मी संशोधन करण्याचा प्रयत्न केला. यातून धक्कादायक माहिती मिळाली. फुलांचा व्यवसाय करणारे नव्वद टक्के व्यापारी अशिक्षित होते. मात्र, त्यांचे ग्राहक सुशिक्षित होते. ग्राहक आणि व्यापारी यांच्यात सुसंवाद नसल्यामुळे फुलांचा व्यवसाय सुरळीत चालत नव्हता. दहा वर्षांपासून सुरु केलेल्या या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली.  तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. 
- श्रीकांत बाहेती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com