भाजी घेता की आजार?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद-सुदृढ आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे गरजेचे आहे; मात्र मुकुंदवाडीतील भाजीमंडईभोवती घाण वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 
येथील मुकुंदवाडी भागात रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे भाजीमंडईसह रोजच्या गुजरीमुळे या ठिकाणी वर्दळ वाढत असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. यातच महापालिकेने केलेले हॉकर्स झोनचे नियोजन कागदावरच असल्याने शहरातील पदपाथ आणि मोक्‍याच्या जागांवर भाजी विक्रेते, फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. बहुतांश मार्केट परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची सोय नाही; तसेच रस्तेही अरुंद असल्याने मार्केट परिसराची कोंडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शिवाय परिसरात अस्वच्छता वाढली आहे. 

पार्किंगची सोयच नाही
भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांना पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहने अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात. त्यामुळे भाजीमंडईकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागते. यातच महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम मंडईच्या परिसरात कधीच फिरकत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनांसह फेरीवाल्यांचेही अतिक्रमण वाढले आहे. अनेक फेरीवाल्यांनी भाजीमंडईच्या बाहेरचा रस्ताच काबीज केला आहे. त्यामुळे रस्त्यावरच भाजीच्या हातगाड्या लावल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. 

नावालाच भाजीमंडई 
भाजीमंडईत पैसे भरून आम्ही गाळा घेतला. वीजबिल, टॅक्‍स भरतो; परंतु भाजीमंडईची कोणीही साफसफाई करीत नाहीत. चार ते पाच चेंबर फुटलेले आहेत. त्यामुळे डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मंडईत खरेदी करण्याऐवजी ग्राहक रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करतात. महापालिकेला पैसे आम्ही भरतो; मात्र अतिक्रमण केलेल्या, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजी विक्रेत्यांना महापालिका प्रशासन काहीच करीत नसल्याचे गाळ्यांतील भाजी विक्रेते संदीप निंबोरे यांनी सांगितले. टॅक्‍स भरूनही भाजीमंडईच्या दुरवस्थेची कोणीही दखल घेत नाही. स्वच्छतागृहांची सुविधा नाही, दीड वर्षापासून भाजीमंडईतील रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर माती, चिखल असतो. याबाबत अनेकवेळा नगरसेवक किंवा महापालिका अधिकारी यांना निवेदने, अर्ज दिले; मात्र कधीही याची दखल घेतली नसल्याचे राधाबाई बचाटे यांनी सांगितले. 

महापालिकेने फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. रस्त्यावर किंवा वाहतुकीला अडथळा व्हावा, असा आमचा उद्देश नाही; पण मंडईत जागा अपुरी असल्यामुळे बाहेर रस्त्यावर बसावे लागते. महापालिकेने योग्य नियोजन केल्यास फेरीवालेही सहकार्य करतील. 
फिरोज पठाण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com