मंत्रिमंडळ बैठकीला चार ऑक्‍टोबरचा मुहूर्त 

मंत्रिमंडळ बैठकीला चार ऑक्‍टोबरचा मुहूर्त 

औरंगाबाद - मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला असून, औरंगाबादमध्ये ती येत्या चार ऑक्‍टोबरला होईल. मंत्रिमंडळाच्या मुंबईत आज झालेल्या बैठकीनंतर पुढील कॅबिनेट औरंगाबादला होईल, असे सूतोवाच केल्यानंतर येथे बैठकीच्या तयारीला सुरवात झाली आहे. मराठवाड्यात राबविण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या "वॉटरग्रीड' या महत्त्वाकांक्षी योजनेला या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे.
त्याशिवाय मराठवाड्यातील विविध प्रश्‍न, औद्योगिक विकासावर बैठकीत मंथन आणि काही महत्त्वाचे निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत. 

मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होणार असे वारंवार सांगितले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे सूचित केले होते. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री येथे आले असता, लवकरच बैठक घेण्याचा शब्द त्यांनी दिला होता. मात्र, मुहूर्त सापडत नव्हता. मुंबईत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आता चार ऑक्‍टोबरवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

तयारी सुरू 
ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक बोईल, असे गृहीत धरून तयारी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीचे संपूर्ण आयोजन हे मुख्य सचिव कार्यालयाकडून केले जाते. त्यामुळे मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव, उपसचिव, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक, शिपाई आदींची एक टीम 2 ऑक्‍टोबरला औरंगाबादेत येणार आहे. या टीमला जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहसचिव सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत. मुख्य सचिव कार्यालयातून सोमवारी (ता. 26) सायंकाळी उशिरा हे पत्र मिळाले. त्यानंतर मंगळवारी (ता. 27) सकाळी अपर विभागीय आयुक्‍त जी. एम. बोडखे यांनी उपजिल्हाधिकारी, उपायुक्‍तांची बैठक घेतली व नियोजनासंदर्भात सूचना दिल्या. 

आयुक्‍तांकडे आज बैठक 
मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने विविध विभागांकडून मागण्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविले जातात. मराठवाड्यासाठी आरोग्य, कृषी, समाजकल्याण, उद्योग, उत्पादन शुल्क, गृह, पर्यटन आदी विविध विभागांच्या मागण्यांचा विचार होणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. 28) सकाळी साडेअकराला विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक आयुक्‍तालयात होणार आहे. 

आठ वर्षांनी होणार बैठक 
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 17, 18 सप्टेंबर 2008 ला औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. ती शेवटची ठरली. त्यानंतर सहा वर्षे आघाडी सरकार सत्तेवर होते; मात्र त्या काळात बैठकीचा मुहूर्त लागला नाही. दोन वर्षांपूर्वी युती सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी मंत्रिमंडळ बैठक औरंगाबादेत घेण्याचे जाहीर केले होते; मात्र दुष्काळामुळे ती टळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com