उस्मानाबाद - विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार), राष्ट्रीय बालविज्ञान परिषद (महाराष्ट्र) व ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे हराळी (ता. लोहारा) येथे 30 नोव्हेंबर व एक डिसेंबरला 26 वी राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद होणार आहे. राज्यभरातून निवड झालेले विद्यार्थी 70 प्रकल्पांच्या संशोधनाचे सादकरीकरण या परिषदेत करतील.
हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात परिषद होईल, असे माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, परिषदेचे समन्वयक अभिजित कापरे, जिल्हा समन्वयक रवींद्र स्वामी, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
"स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी - विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना' हा परिषदेचा विषय आहे. 30 नोव्हेंबरला परिषदेचे उद्घाटन होईल, एक डिसेंबरला पारितोषिक वितरणाने समारोप होईल. या परिषदेत राज्यातील 19 जिल्ह्यांतील दीडशे विद्यार्थी, शंभर शिक्षक सहभागी होतील. 10 ते 17 वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर यापूर्वी स्पर्धा घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 70 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. या 70 प्रकल्पांतून 30 प्रकल्पांची निवड राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी केली जाणार आहे.
|