कृषी सहायकाच्या लग्नाला जिल्हाधिकारी वऱ्हाडी

marriage
marriage

तिवटघ्याळ (लातूर) : लातूर जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्याचा विडा सर्वांनीच उचलला आहे. यातूनच गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियान व विविध माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली. कामे पूर्ण करणाऱ्या जबाबदारी पेलताना हडोळती (ता. अहमदपूर) येथील महिला कृषी सहायक सुनिता चात्रे यांनी त्यांचा विवाहही पुढे ढकलला. चात्रे यांच्या निर्णयाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मोठे कौतुक वाटले आणि त्याच वेळी त्यांच्या लग्नाला वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहण्याचा शब्द त्यांनी दिला. बुधवारी (ता. 2) तिवटघ्याळ येथे चात्रे यांच्या लग्नाला हजेरी लावून श्रीकांत यांनी शब्द पाळला.

यातून त्यांनी सरकार दरबारी काम करणाऱ्या महिलांना पाठबळ देण्यासोबत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य बेटी बचाओ - बेटी पढाओची संकल्पना मजबूत केली. प्रशासकीय कामातून सवड काढून श्रीकांत यांनी चात्रे यांच्या लग्नाला लावलेली उपस्थिती सर्वांनाच धक्का देणारी ठऱली. काही वर्ष नांदेड जिल्ह्यात काम केल्यानंतर चात्रे हडोळती येथे कृषी सहायक म्हणून सेवा बजावत आहेत. आपल्या कामातून त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ पोहचवला आहे. महिला शेतकऱ्यांत त्यांनी आपलेपणा निर्माण केला आहे. यामुळे चात्रे या हडोळतीकरांना मुलीसारख्याच वाटत आहेत. गेल्यावर्षी उन्हाळ्यात दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाची कामे जोरात सुरू होती.

सकाळ रिलीफ फंडातूनही गावात काम झाले. मोठ्या संख्ये कामे सुरू असतानाच चात्रे यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह दरेगाव (जि. नांदेड) येथील बालाजी कलेटवाड यांच्यासोबत जमवून  डिसेंबर 2017 मधील तारीखही निश्चित केली. मात्र, जलसंधारणाची कामे वेळेत पू्र्ण करताना डिसेंबरमध्ये लग्न शक्य नव्हते. चात्रे यांनी आधी जलसंधारणाची कामे व त्यानंतरच लग्न, असा निर्धार घऱच्यांना कळवला. दुष्काळमुक्तीसोबत स्वतःच्या कामाप्रती असलेल्या भावनेचा सर्वांनाच अभिमान वाटला व लग्नाची तारीख पुढे ढकलली. सकाळ रिलीफ फंडातून नाला खोलीकरणाच्या कामाच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकांत यांना याची माहिती मिळाली. त्यांनीही चात्रे यांच्या निर्णयाचे कौतुक करत त्यांच्या लग्नाला वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहण्याचा शब्द दिला व पाळला. चाकूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्यासह हडोळतीकरही मोठ्या लग्न समारंभाला उपस्थित होते. 

लग्न तयारीची विचारपूस
तिवटघ्याळ या लहानशा खेड्यात चात्रे यांचा विवाह मंगळवारी संपन्न झाला. त्यापूर्वी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी अहमदपूर व चाकूर तहसीलदारांशी संपर्क साधून चात्रे यांच्या लग्नाच्या तयारीची माहिती घेतली. त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली. यामुळे चात्रे यांच्या लग्नासाठी प्रशासनही सतर्क झाले होते. कृषी विभागातील शेवटचा घटक असलेल्या कर्मचाऱ्याच्या लग्नासाठी श्रीकांत यांची हजेरी महिला  कर्मचाऱ्यांना बळ देऊन गेली.  त्यांच्या उपस्थितीने चात्रे कुटुंबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com