जिल्हा परिषद बदल्यांच्या घोडेबाजाराला यंदा कोरोनाचा ब्रेक

zp
zp

हिंगोली ः जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील वर्ग तीन, चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आपसी, विनंती, बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा कोरोना संसर्गमुळे ब्रेक लागल्याने शासनाने बदल्या न करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यामुळे सर्व बदल्या सीईओ स्तरावरून रद्द केल्या असल्याने होणाऱ्या घोडेबाजाराला ब्रेक लागला आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांतील वर्ग तीन, चार संवर्गातील बदली प्रक्रिया साधारण जून महिन्यात पार पडते. शासनाने जिल्हा परिषदेला बदल्यांचे आदेश दिल्यानंतर सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली बदली प्रक्रिया दरवर्षी इनकॅमेरा घेण्यात येते. यंदा मात्र जगभरासह कोरोनाने थैमान घातल्याने देशात दोन महिन्यांपासून लॉकडाउन लागू केले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार शासकीय कार्यालयांत सुरवातीला दहा टक्के कर्मचारी, त्‍यानंतर तीस टक्के कर्मचारी काम करतील, असे शासनाने सांगितले. त्यामुळे कार्यलयांतील गर्दी टाळण्यासाठी अभ्यागतांना मेलद्वारे तक्रारी किंवा कामकाज करण्याचे सांगितले आहे. कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्व साधारण बैठकादेखील घेता आल्या नाहीत. केवळ विभाग प्रमुखांच्या बैठका सोशल डिस्टन्स ठेवून घेतल्या जात आहेत.

काही कामे संथ गतीने...
कोरोनामुळे जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी, सदस्य, गुत्तेदार आपली बिले काढण्यासाठी चकरा मारत आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत सर्व कामे रेंगाळली आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री वर्षा गायकवाड हिंगोली येथे आल्या असता पाणीटंचाईची कामे, बांधकाम विभागामार्फत रस्त्याची कामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. मात्र, बांधकाम विभागाकडून केली जाणारी कामे मात्र संथ गतीने सुरू आहेत.

मागील वर्षी सलग वीस दिवस प्रक्रिया
मागील वर्षी जिल्हा परिषदेंतर्गत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत मोठी उलाढाल झाल्याची चर्चा जिल्‍हा परिषदेच्या वर्तुळात आहे. मागील वर्षी सलग वीस दिवस बदली प्रक्रिया सुरू होती. जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व चार संवर्गातील बदली पात्र, विनंती, आपसी बदल्या करण्यासाठी कर्मचारी विभागप्रमुख व संबंधित सदस्यांना हातसी धरून त्याच विभागात राहू द्या, म्हणून गळ घालत असतात. बदली पात्र असतानाही त्या कर्मचाऱ्यांची बदली केली जात नाही. यंदा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची कोरोनामुळे बदली प्रक्रिया रद्द झाली.

टेबल बदली नको...
बदल्या रद्द झाल्याने होणाऱ्या घोडेबाजारालाही ब्रेक लागला असल्याने काहीजण बिनधास्तपणे आपल्याच विभागात कामकाज करण्यासाठी मोकळे झाले आहेत. टेबल बदली होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागात गेली तीन ते चार वर्षांपासून एकाच विभागात कर्मचारी काम करीत आहेत. यंदा मात्र कोरोनामुळे या सर्व प्रकाराला ब्रेक बसला आहे. 

शासन आदेशाने बदल्या रद्द 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी या काळात वर्ग एक ते चार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने जारी केल्याने बदल्या रद्द केल्या आहेत. त्‍यामुळे या वर्षी बदल्यांचा प्रश्नच येत नाही. 
- धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com