यंदा कपाशीची लागवड घटणार? 

तीर्थपुरी : दुकानावर बियाणे खरेदीसाठी आलेले तुरळक शेतकरी.
तीर्थपुरी : दुकानावर बियाणे खरेदीसाठी आलेले तुरळक शेतकरी.

तीर्थपुरी (जि.जालना) - शेतातील पिकांवरील खर्च दिवसेंदिवस वाढत असून, झालेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी कोणते पीक घ्यावे, या चिंतेत आहेत. यंदा या भागात कपाशीची लागवड ४० ते ५० टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

कपाशी या पिकावरील झालेला खर्च मिळत नसल्याने; तसेच वर्षभर कापूस घरात ठेवूनही विक्री होत नसल्याने शेतकरी कपाशीऐवजी सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. 

जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी व परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कपाशी या पिकाची लागवड होत असते; परंतु शेतकऱ्यांना होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कपाशीपासून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी कपाशी लागवड कमी करणार असल्याचे चित्र दिसत आहे. या भागात दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र ४० ते ५० टक्के कपाशी लागवडीत घट होणार असून, शेतकरी कपाशीऐवजी सोयाबीन व इतर पिकांना प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.

या भागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. दरवर्षी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कपाशीचे बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत असते; परंतु यंदा मात्र कपाशी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत नाही. 

खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी 

शेतकऱ्यांचा कपाशीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यात कपाशीचा उत्पादन खर्च एकरी जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये होतो, तर उत्पादन एकरी पिकापासून ५ ते ६ क्विंटलपर्यंत होत आहे. कापसाला भाव कमी असल्याने खर्चाच्या तुलनेत हे पीक फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे शेतकरी यंदा कमी लागवड करीत आहे. 

गतवर्षीचा कापूस घरात 

गतवर्षीचा कापूस विक्री करण्याअभावी घरात राहिला असून, अनेक शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव मिळेल, या हेतूने मोठ्या प्रमाणात गतवर्षीचा कापूस घरात ठेवला; परंतु हा कापूस विक्री होत नसल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. खरेदी केंद्र नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडत नाही. 

गतवर्षी कापसाचे उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी झाले असून, खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने कापूस विक्री करावा लागला. कापसाला भाव चांगला मिळेल, या आशेने कापूस घरात ठेवला होता; परंतु भाव कमी झाले व नवीन लागवड करण्याची वेळ आली. त्यामुळे कमी दराने कापसाची विक्री केली. 
- मेहेरनाथ बोबडे, शेतकरी 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या बियाणांची आतापर्यंत खूप कमी प्रमाणात विक्री झाली आहे. आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत चाळीस ते पन्नास टक्के कापसाच्या बियाणाची विक्री झाली आहे. त्यामुळे यंदा कपाशी लागवड कमी होण्याची शक्यता आहे. 
- श्याम जाधव, कृषी सेवा केंद्रचालक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com