वैजापूर : भगर पीठ खाल्याने शहरासह ग्रामीण भागातील तब्बल ११८ लोकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान,विषबाधा झालेल्या लोकांची प्रकृती आता स्थिर असून काही रुग्णांना सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता.२७) सकाळी अचानक एकाचवेळी रुग्णालयात रुग्णांची गर्दी झाल्याने एक बेडवर दोन-दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आल्याचे चित्र काही दिसून आले.
तालुक्यात सोमवारी ज्या लोकांनी भगर पीठ खाल्ले त्यांना रात्रीच्या सुमारास मळमळ, उलटी व पोट दुखीचा त्रास सुरु झाले. त्यामुळे नागरिकांना शहरातील उपजिल्हा रुग्णालय व खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने दवाखाने फूल झाले होते. दरम्यान, अचानक उद्भवलेल्या या त्रासामुळे आरोग्य यंत्रणा सुद्धा हादरली. शहरातील काही खासगी रुग्णालयात बेड सुद्धा उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांना ॲडमिट करण्यासाठी नातेवाइकांची धावपळ झाली.
याबाबत माहिती मिळताच आमदार रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी शहरातील सर्व रुग्णालयात जाऊन रुग्ण तसेच डॉक्टरांची भेट घेतली. तसेच परिस्थितीचा आढाव घेतला. तसेच शहरात एफडीएचे अधिकाऱ्यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. रुग्णांकडून सायंकाळी उशिरापर्यंत जवाब नोंदविण्याचे काम सुरु होते. यावेळी बहुतांश लोकांनी दुकानातून खरेदी केलेले भगर पिट खाल्याने हा त्रास झाल्याचे सांगितले. त्यामुळे कोणत्या दुकानातून हे भगर पीठ आणले गेले. त्या भगरचे सॅंपल जमा करून प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असून त्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएचे अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात ३१ व ग्रामीण भागात ८७ असे ११८ लोकांना तालुक्यात विषबाधा झाली. या सर्वांवर सध्या विविध शासकीय व खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे.
-डॉ.विलास डुकरे, तालुका आरोग्य अधिकारी वैजापूर
अहवाल सादर करण्याचा सूचना
आरोग्य पथकामार्फत संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देवून रुग्ण सर्वेक्षण व उपचारात्मक तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, सदरील गावामध्ये या अनुषंगाने आरोग्य शिक्षण देवून कारणांची चौकशी करण्यात यावी, सदरील अन्नाचा नमुना घेऊन अन्न व औषधी विभाग, तसेच सुक्षजियशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात यावा अशा सूचना जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भगर खाल्यामुळे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील गावांमध्ये नागरीकांना उलट्या, मळमळ व चक्कर येणे अशी लक्षणे दिसून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे प्रकरण शोधण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केले असून लक्षणे आढळल्यास रुग्णाला पुढील उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
-डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.