शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना! कर्ज वाटपाचा टक्का केवळ ९.८५

जिल्ह्यात खरीप पीककर्जाचे वाटप कासवगतीने सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उशीरा होत आहेत
crop loan
crop loancrop loan

बीड: दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. परंतु, जिल्ह्यात अद्याप ३६ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असतानाच या हंगामात केवळ ९.८५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी १,६०० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत केवळ २३,०३४ शेतकऱ्यांना १५७ कोटी ६५ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. आणखी ९० टक्क्यांचे उद्दिष्ट बँका कधी पूर्ण करणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणांचा फटकाही नेहमीच सहन करावा लागतो. गतवर्षी अतिवृष्टीच्या नुकसानीपासूनही शेतकरी वंचित आहेत. विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या हातावर तुरीच ठेवल्या आहेत. दरम्यान, दीड वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी यंदा पावसाने चांगली सुरवात केल्याने खरीप पेरणीच्या तयारीत आहे. मात्र, याचवेळी आता बँकांनी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना आडकाठी घातल्याचे दिसून येत आहे.

crop loan
धक्कादायक! लातुरात मतिमंद महिलेचे बाळ दुसऱ्याच्या नावावर

एप्रिल महिन्यात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले. मात्र, पीक कर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे केवळ तीन बँकांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दहा टक्क्यांहून अधिक आहे. तर, दहा बँकांनी अद्याप पाच टक्केही वाटप केले नाही. एकूण वाटपाची टक्केवारी केवळ ९.८५ टक्के आहे. आतापर्यंत २३,०३४ शेतकऱ्यांना १५७ कोटी ६५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

बँकनिहाय पीक कर्ज वाटप (टक्क्यांत) -
- बँक ऑफ बडोदा : ७.९९
- बॅंक ऑफ इंडिया : २.२८
- बॅंक ऑफ महाराष्ट्र : १.७०
- कॅनरा बँक : २.५८
- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया : २.००
- पंजाब नॅशनल बँक : ०.८८
- स्टेट बॅंक ऑफ इंडिया : १०.५९
- युनियन बॅंक ऑफ इंडिया : ५.६१
- एक्सिस बँक : १.७०
- डीसीबी बँक : ७.१७
- एचडीएफसी बँक : ५.३५
- आयसीआयसीआय बँक : ३.७८
- आयडीबीआय बँक : २.५९
- कोटक महिंद्रा बँक : ००
- आरबीएल बँक : ७१
- महाराष्ट्र ग्रामीण बँक : ८.२५
- जिल्हा मध्यवर्ती बँक : २८.२३

crop loan
बीडकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला

आरबीएलचा हात भलताच सैल-

कर्ज वाटपाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यानंतर आरबीएल बँकेचे वाटप ७१ टक्के आहे. विशेष म्हणजे या बँकेने केवळ ६२ शेतकऱ्यांना दोन कोटी ८४ लाखांचे वाटप केले आहे. म्हणजेच सरासरी एका शेतकऱ्याला चार लाख ५८ हजार रुपये वाटप केले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ८७ हजार तर ग्रामीण बँकेने ७२ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी वाटप केले आहे. विशेष म्हणजे उद्दिष्ट पूर्तीसाठी गतवर्षीच्या वाटपाचे आकडेही बँकेने यंदाच्या आकड्यांत मिसळले आहेत. मर्यादित ग्राहक असल्याने सक्षम शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केल्याचे शाखा व्यवस्थापक शशिकांत श्रीवास्तव म्हणाले.

३६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
एकीकडे पीक कर्जासाठी बँकांनी हात आखडलेले असतानाच पीक कर्जमाफीसाठीही ३६ हजार शेतकरी व्याकूळ झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. यासाठी तीन लाख तीन हजार ९२५ शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी दोन लाख ६७ हजार ९४५ शेतकऱ्यांना १,४९४ कोटी ६३ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम भेटली आहे. मात्र, अद्यापही ३५ हजार ९८८ पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.

आजच बँकर्सची बैठक घेतली आहे. वेगाने पीक कर्जवाटप करून उद्दिष्टपूर्ती करावी, शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण करून घ्यावे. साडेचार हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रीया केली नाही.
- रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय बँकर्स समिती, बीड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com