...या पुलावरील भगदाड बनले जीवघेणे

samaga pul
samaga pul

हिंगोली : तालुक्‍यातील समगा येथील कयाधू नदीवरील पुलाचे भगदाड कायम असून या पुलावर आठ गावातील गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या बांधकाम विभागाने पुलाच्‍या दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक तयार केले. मात्र, दुरुस्‍तीला अद्यापही मुहूर्त लागलाच नाही.

तालुक्‍यातील समगा येथे कयाधू नदीवर छोटा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून समगा, दुर्गधामणी, कंजारा, पूर, हिवरा यासह आठ गावांतील गावकऱ्यांना वाहतूक करावी लागते. दररोज सकाळी दूध विक्रेत्‍यांसोबत भाजीपाला विक्रेते या मार्गावरून हिंगोली शहरात येतात. यासोबत शालेय विद्यार्थीदेखील हिंगोली येथे शिक्षणासाठी येतात. शेतकरी व इतर प्रवाशांना या पुलावरून वाहतूक करावी लागते.
पुरामुळे मोठे भगदाड
दरम्‍यान, मागील वर्षी कयाधू नदीला आलेल्‍या पुरामुळे या पुलाच्‍या रस्‍त्‍याच्‍या काही भाग वाहून गेल्‍याने मोठे भगदाड पडले. त्‍यामुळे या भागातील गावकऱ्यांना मोठ्या रेल्‍वे पुलावरून वाहतूक करावी लागली होती. जिल्‍हा परिषदेच्‍या बांधकाम विभागाने तातडीने पुलाच्‍या दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक तयार केले. तर युवा सेनेचे जिल्‍हाप्रमुख दिलीप घुगे यांनी गावकऱ्यांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी स्‍वखर्चातून मुरूम टाकून रस्‍ता दुरुस्‍त करून घेतला. मात्र रस्‍त्‍याची दुरुस्‍ती झाल्‍यानंतर बांधकाम विभागाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. 

बांधकाम विभागाला मुहूर्त सापडेना
दरम्‍यान, या वर्षीही पावसामुळे पुलाच्‍या रस्‍त्‍यावरील मुरूम वाहून गेला. त्‍यामुळे छोटी वाहने जाण्याएवढा रस्‍ताच शिल्‍लक राहिला आहे. सायंकाळच्‍या वेळी या ठिकाणी अपघात होऊ लागले आहेत. मात्र, बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मागील वर्षी तयार केलेल्‍या अंदाजपत्रकानुसार पुलाचे काम करण्यास बांधकाम विभागाला अद्यापही मुहूर्त सापडला नाही. त्‍यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्‍या रस्‍त्‍याची दुरुस्‍ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्‍थित केला जाऊ लागला आहे.

बांधकाम विभागाला कधी जाग येणार?
समगा पुलावरून परिसरातील आठ गावातील गावकऱ्यांची ये-जा असते. त्यामुळे दिवसभर वर्दळ सुरू असते. मात्र, अरूंद पूल बनल्याने जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. मात्र, येथील पुलावर पडलेले भगदाड बुजवण्यासाठी बांधकाम विभागाला वेळ का मिळत नाही? प्रवाशाचा जीव गेल्‍यानंतर बांधकाम विभागाला जाग येणार का? असे प्रश्न आहेत. बांधकाम विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com