टपोऱ्या गारांमुळे उभ्या पिकांचे नुकसान, कुठे ते वाचा...

Tarbuja
Tarbuja

बिलोली ः चिटमोगरा (ता. बिलोली) परिसरात शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतातील ज्वारी, भुईमूग, टरबूज, तुती रोपांची व रेशमी शेडसह भाजीपाला, आंब्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हरवून गेला आणि पुन्हा शेतकरी संकटात सापडला असून संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त गावातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून निवेदनाद्वारे केली आहे.

बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील गट क्रमांक १३७ मध्ये सहा लाख खर्च करून शेड मारून रेशीमची लागवड केली असून अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेडचे व रेशमाचा तोंडाला आलेले पिके जमीनदोस्त झाले, तर बालाजी यादव कुदरे गट क्रमांक १९१ मध्ये एक एकरमधील टरबूज, निलाबाई कोंडिबा महेत्रे, बळिराम संभाजी भत्ते, कामाजी संभाजी भत्ते याच्या शेतातील तीन एकरमध्ये उसनवारी करून चार लाख खर्च करून टरबूज लागवड केली होती. अचानक झालेल्या गारपिटीमुळे जमीनदोस्त झाले, तर लक्ष्मण श्‍यामराव शेळके यांच्या शेतातील अनेक दिवसांपासून दरवर्षी दहा हजार रुपयांचे उत्पन्न देणारे आंब्याचे झाड मोडून पडले व सर्व आंब्याचा सडा पडला आहे. 

दोनशे केसर आंब्याच्या झाडांचे नुकसान  
नागाबाई शंकर सोनकांबळे याच्या शेततामधील केसर आंब्याचे दोनशे व लिंबाच्या दहा झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. अल्प पावसामुळे अगोदरच या भागात दुष्काळी परिस्थिती असून गत काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहेत. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता अचानक वातावरणात बदल झाला आणि चिटमोगरासह काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. पण तालुक्यातील चिटमोगरा व थडीबोरगाव भागात जवळपास अर्धा तास गारपीट झाली. त्यामुळे येथील नागरिकांची एकच धांदल उडाली.

शंभर ग्रामच्या गारा पडल्याने नुकसान
या दोन्ही गावांत शंभरग्रामच्या गारा पडल्याने भाजीपाला, आंब्याचे, टरबूज, रेशमी, ज्वारी, भुईमूग, हळदीसह उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चिटमोगरा येथील शेतकरी गोदावरीबाई आनंदराव पेन्टे, यादव कुदरे, रामकिशन कुदरे, गंगाधर मालू भेदेकर, शेख खान साब महेतासाब, बालाजी विठ्ठल काळेकर, ज्ञानेश्वर विठ्ठलराव केळकर, भीमराव गोविंद काळेकर, निलाबाई कोंडिबा महेत्रे, बळिराम संभाजी भत्ते, कामाजी संभाजी भत्ते, लक्ष्मण श्‍यामराव शेळके, नागाबाई शंकर सोनकांबळेसह आदी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज गूल झाल्यामुळे उकाड्यात वाढ
सायंकाळी सहाच्या दरम्यान चिटमोगरा परिसरातील काही भागात विजेचा कडकडाट होऊन गारपीट झाली. त्यामुळे लाईट गूल झाल्यामुळे उकाड्याच्या प्रामाणात अधिक वाढ झाली. नागरिकांची तगमग होत आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने व गारपिटीमुळे भाजीपाला, टरबूज, रेशमी आंब्याचे व आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त गावातील पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

जिल्हा परिषद सदस्य लोहगावे यांनी पिकांची केली पाहणी
जिल्हा परिषदेचे सदस्य माणिकराव लोहगावे यांनी रविवारी बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अचानक झालेल्या गारपिटीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाई अनुदानासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन देत शेतकऱ्यांना धीर दिला. या वेळी जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, मंडळ कृषी अधिकारी आनंद येमलवाड, तलाठी टकले, कृषी सहायक एल. के. कोकणे, ग्रामसेवक आनंद खेडकर, उपसरपंच भास्कर भेदेकर आदींनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com