जालना - मागील चार दिवसांपूर्वी जालना-रोहनवाडी येथील फरशी पुलावरून कुंडलिका नदीपात्रात वाहून गेलेल्या रवना (ता. घनसावंगी) येथील तरुणाचा मृतदेह अखेर चार दिवसांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधून काढला आहे. ऋषिकेश नाटकर (वय २६, रवना, ता. घनसावंगी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
जालना-रोहनवाडी मार्गावरील कुंडलिका नदीपात्रावर फरशी पूल आहे. या फरशी पुलावरून सध्या कुंडलिका नदीचे पाणी पाहत आहे. पुलावरून कुंडलिका नदीचे पाणी वाहत असताना सोमवारी (ता.१७) रात्री एका दुचाकीस्वाराने दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दुचाकीसह तरुण नदीपात्रात वाहून गेला होता. त्यानंतर मागील चार दिवसांपासून अग्निशामक दलाचे जवान या तरुणाचा मृतदेह शोधण्याच्या कामात गुंतले होते. जालना-रोहनवाडी फरशी पुलापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर सारवाडी शिवारातील कुंडलिका नदीपात्रातून ऋषिकेश नाटकर याचा मृतदेह गुरुवारी (ता.२०) अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीपात्रातून बाहेर काढला.
हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.
या शोधमोहिमेदरम्यान उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वेळोवेळी भेटी दिल्या. तसेच अग्निशामक दलाचे अधिकारी डी. ए. जाधव, कर्मचारी कमलसिंग राजपूत, सागर गडकरी, किशोर सगट, रवी तायडे आदींनी शोधकार्य केले.
शेतातून बैल घेऊन घरी परतणारा शेतकरी रोषणगाव (ता. बदनापूर) शिवारातील लहुकी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना बुधवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, यासंदर्भात नदीच्या पात्रात शोधमोहीम राबविल्यावर त्याचा मृतदेह गुरुवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास सापडला. रोषणगाव येथील शेतकरी धोंडीराम सांडू आकोदे (वय ६२) आपल्या शेतात काम करून बुधवारी सायंकाळी घरी परतत होते. मात्र त्यांना लहुकी नदीचे पात्र ओलांडून येताना पुराचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. त्यांचा मृतदेह गुरुवारी पहाटे जनार्दन खरात यांच्या गोठ्यासमोरील नदीच्या पात्रात तरंगताना आढळला. याप्रकरणी रोहिदास धोंडीराम आकोदे यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक फौजदार इब्राहिम शेख करीत आहेत.
धोंडीराम यांच्यासोबत असलेली बैलजोडी घरी परतली. मात्र ते आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना धोंडीराम पाण्यात वाहून गेल्याचा संशय आला. त्यानंतर नदीच्या कडेला व पात्रातील पाण्यात त्यांचा शोध घेण्यात आला.
(संपादन : संजय कुलकर्णी)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.