
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून ता. एक ते ता. सात एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील २३ लाख एक हजार पाच शिधा पत्रिकाधारकांना ५५ हजार ३११.५६ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी दिली. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.
२१ लाख लाभार्थ्यांना धान्य वितरीत
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे २१ लाख आहेत. या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएलकार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रुपये किलो दराने प्रतीकार्ड १५ किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने प्रतीकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
५५ हजार क्विंटल धान्याचे वाटप
केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व एपीएल शेतकरी पात्र लाभार्थ्यांना दोन रुपये किलो दराने प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन किलो दराने प्रती व्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. जिल्ह्यात यासर्व योजनेमधून सुमारे ३३ हजार ७१९.८५ क्विंटल गहू, २१ हजार २९०.११ क्विंटल तांदूळ, तर ३०१.६ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सहा हजार ३५२ शिधा पत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे. त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
हेही वाचा....बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात
मोफत तांदळाचे तेरा तारखेपासुन वितरण
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्डधारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ येत्या तेरा एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन केंद्रीय वखार महामंडळकडून दहा हजार ७६२ टन तांदुळ प्राप्त करून घेतला आहे. तेरा एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या-त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
हेही वाचलेच पाहिजे....सिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा
जास्त दराने विक्री केल्यास कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे, आदेश देण्यात आल्याची माहिती शरद मंडलीक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.