काय सांगता..! जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबूक लाईव्ह बंद केले; लाखो फालोअर्स अस्वस्थ झाले 

G shrikant.jpg
G shrikant.jpg

लातूर : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा मागील १३३ दिवसापासून नियमित सुरू असलेला फेसबुक लाईव्ह उपक्रम सहा दिवसापासून अचानक बंद झाला आहे. हा कार्यक्रम बंद करण्याचे कोणतेही कारण श्रीकांत यांनी आपल्या फेसबुक पेजवर न दिल्याने त्यांचे लाखो फालोअर्स अस्वस्थ झाले आहेत. हे फालोअर्स त्यांना फेसबुक लाईव्ह उपक्रम पुन्हा सुरू करण्याची मागणी करतानाच शहरात पुन्हा पंधरा दिवसासाठी लागू केलेला लॉकडाऊन रद्द करण्याची जोरदार मागणी कंमेटमधून करत आहेत.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांचा प्रशासनाशी असलेला संपर्क कायम ठेऊन त्यांच्या संवाद साधण्यासाठी व लोकांच्या समस्या व प्रश्न सोडवून त्यांना समाधान देण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी फेसबुक लाईव्हचा उपक्रम सुरू केला होता. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून दररोज सायंकाळी ते उपक्रमांतून लोकांना प्रशासन तसेच सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांसोबत उपाययोजनांची माहिती देत होते. लोकांनी कंमेट व मेसेजमधून विचारलेल्या प्रश्नांनाही ते उत्तर देत असत. यामुळे नागरिकांचे प्रश्न बसल्या जागी सुटू लागले. त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ लागले. 

उपक्रमातून श्रीकांत यांनी विविध सरकारी विभागाच्या योजनांचीही माहिती देण्यास सुरूवात केली होती. या विभागाच्या अधिकाऱ्यांना उपक्रमात सहभागी करून लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना तडीस नेली. २ ऑगस्टपर्यंत सलग १३३ दिवस हा उपक्रम सुरू होता. या उपक्रमांतूनच श्रीकांत यांचे लाखाहून अधिक फालोअर्स तयार झाले व सर्वांनाच उपक्रमाची सवय लागली होती. रोज नवीन काही तरी ऐकायला मिळत होते. कोरोना रूग्णांच्या वाढलेल्या संख्येसोबत प्रशासनाने त्यापुढे जाऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती लोकांना मिळत होती.

अफवा व अन्य कारणांमुळे लोकांच्या मनातील भीती व अस्वस्थता दूर व्हायची. मात्र, तीन ऑगस्टपासून अचानक हा उपक्रम बंद पडला. श्रीकांत कामात व्यस्त असल्याचे पहिल्या दिवशी सर्वांना वाटले. त्यानंतरही हा उपक्रम बंद राहिल्याने फालोअर्स व नागरीक अस्वस्थ झाले आहेत. यातच त्यांच्या बदलीचीही चर्चा घडून येत असल्याने अस्वस्थता वाढली आहे. या स्थितीतही फालोअर्सकडून हा उपक्रम सुरू करण्याची तसेच शहरातील लॉकडाऊन रद्द करण्याची जोरदार मागणी सुरू आहे.    

महत्वाच्या प्रश्नांना उत्तर

फेसबुक लाईव्ह कार्यक्रम बंद झाला असला तरी लोकांनी फेसबुक पेज तसेच वॉटसअपवर विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांना श्रीकांत उत्तर देत आहेत. फालोअर्संना श्रीकांत यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम बंद केल्याच्या कारणांची प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, त्याला श्रीकांत यांच्याकडून काहीच उत्तर देत नाहीत. त्यांचे हे `मौन` कशामुळे आहे? यावरही फालोअर्स चर्चा करत असून काहींनी चुकीच्या प्रतिक्रिया देऊन त्यांचे मन दुखावल्याने नाराज होऊन त्यांनी हा उपक्रम बंद केल्याचेही फालोअर्स बोलत आहेत. सध्या तरी उपक्रम अचानक बंद झाल्याने फालोअर्स व नागरिक संभ्रमात असून लवकरच हा उपक्रम श्रीकांत सुरू करतील, असे सर्वांना वाटत आहे.

संपादन-प्रताप अवचार
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com