बाबासाहेबांना अभिवादनासाठी भडकल गेटवर जनसागर

औरंगाबाद - समता सैनिक दलातर्फे अभिवादन करण्यात आले.
औरंगाबाद - समता सैनिक दलातर्फे अभिवादन करण्यात आले.

औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या.

भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून अभिवादनासाठी विविध घटकांतील नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील विविध वसाहतींमधून निघालेल्या पदयात्रा, दुचाकी फेऱ्या भडकल गेट येथे येऊन धडकत होत्या. या वेळी आमदार इम्तियाज जलील, गफ्फार कादरी, नगरसेवक गंगाधर ढगे, मिलिंद दाभाडे, गौतम लांडगे, गौतम खरात, अफसर खान, अनिल भिंगारे, सतनामसिंग गुलाटी, गौतम आमराव, कृष्णा बनकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील नेते, पदाधिकारी आणि नागरिक यांनी अभिवादन केले.

विमानातून पुष्पवृष्टी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर चार्टर्ड विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्याचा हा वेगळा प्रयत्न भाजपतर्फे अनुसूचित जाती मोर्चा व मागासवर्गीय उद्योजक संघटनेने केला. शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, अशोक नरवडे आणि उत्तम अंभोरे यांनी यात सहभाग घेतला. यासाठी अनिरुद्ध सोमाणी, प्रवीण नरवडे, अतीश नरवडे, आदित्य नरवडे यांनी पुढाकार घेतला.

महापालिकेचे अभिवादन
महापालिकेतर्फे महापौर बापू घडामोडे यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती मोहन मेघावाले, गजानन बारवाल, बंडू ओक, रवींद्र निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मानवंदना
समता सैनिक दलातर्फे सुभेदार विलास सिरसाट, के. जे. त्रिभुवन, हवालदार गौतम पगारे, डी. जे. रायबोले, भीमराव घोरपडे आदींसह सैनिकांनी उपस्थित राहून अभिवादन व मानवंदना दिली.

अ.भा. समता सैनिक दल
भडकल गेट येथे ऍड. डी. व्ही. खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देण्यात आली. या वेळी सुखदेव केदार, अर्जुनराव भुईगड, पुरुषोत्तम वंजारी, जी. बी. तायडे, जया गजभिये, सुलताना पठाण, रंजना थोरात, वंदान जाधव, मनीषा लांडगे, कडुबा महाले, भिकन नन्नावरे, पुंडलिक त्रिभुवन, ऍड. बी. एच. गायकवाड, ऍड. बी. एस. डोंगरे, ऍड. डी. बी. झोडगे आदींची उपस्थिती होती.

जिल्हा वकील संघ
अध्यक्ष ऍड. ए. बी. भोसले, सचिव विजेंद्र सरोसिया यांनी आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तत्पूर्वी, अदालत रोडपासून दुचाकी फेरी काढण्यात आली. भडकल गेट येथे फेरीचा समारोप झाला. कार्यक्रमास ऍड. शिवाजी नवले, ऍड. गणेश डहाळे, ऍड. भारती महातोले, ऍड. नितीन ताठे, ऍड. मंगेश आमले, ऍड. सिद्धार्थ बनसोडे, ऍड. उमेश दरक, ऍड. नितीन जाधव, ऍड. तथागत कांबळे, ऍड. अनुराधा मगरे, ऍड. ईश्वर मोहिते, ऍड. विशाल पगारे, ऍड. कल्पना सावळे, ऍड. योगेश तुपे, ऍड. विठ्ठल वायाळ, दादाराव चव्हाण, गणेश सदाशिवे, बाळू हिवराळे, ऍड. संजय भिंगारदेव, ऍड. एम. एन. देशमुख, पी. एन. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

"एक वही, एक पेन' उपक्रम
कल्पेश गायकवाड मित्रमंडळातर्फे उपासकांना शिरा वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच "एक वही, एक पेन' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सहाशे वह्या आणि पेन जमा झाले आहेत. जमा झालेल्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे कल्पेश गायकवाड यांनी सांगितले. यामध्ये निखिल वडनेरे, अक्षय कुशेर, राजेश शेजवळ, विशाल काळे, आकाश राऊत, संकेत खेडकर, कीर्ती सोनवणे, अतुल मगरे, अक्षय साळवे, आकाश निकम, मुकेश पंडागळे, प्रणव कडपे, गजानन घोरपडे आणि अजय भगत यांनी सहभाग घेतला.

अन्नदानासाठी पुढाकार
भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान आणि सिद्धोधन प्रतिष्ठानतर्फे उपसकांना शिरा आणि पोहे वाटप करण्यात आले. रस्त्यावर जाणाऱ्यांना थांबवून दोन घास खाण्याचा आग्रह धरण्यात येत होता. मनसेतर्फे गौतम आमराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी थंड पाण्याची व्यवस्था केली होती. तर डी.एस. ग्रुपतर्फे पाणी पाऊचची व्यवस्था करण्यात आली होती.

फेसबुक मुव्हमेंटचे प्रबोधन
आंबेडकरी विचारधारेशी बांधिलकी असलेला फेसबुक आंबेडकरी मुव्हमेंट या ग्रुपतर्फे उपक्रम घेण्यात आले. या ग्रुपतर्फे "एक वही, एक पेन' हा उपक्रमासह बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उपासक-उपासिकांना फुले, शाहू, आंबेडकर यांच्याविषयी तीन प्रश्‍न विचारण्यात येत होते. तिन्ही प्रश्‍नांचे उत्तर बरोबर देणाऱ्याला बाबासाहेबांचे "जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे पुस्तक भेट देण्यात येत होते. या उपक्रमात शेखर निकम, विश्‍वजीत करंदीकर, मिलिंद खंडेराय, दौलत शिरसवाल, पंकज सुपाळे, निखिल वाडेकर, अजय नवले, राहुल कांबळे हे सहभागी झाले होते.

संविधान बदणे शक्‍य नाही - खासदार खैरे
आजच्या परिस्थितीत काही लोक घटना बदलण्याची भाषा करीत आहेत; मात्र कोणी कितीही झटले तरी बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणीही बदलू शकणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे भडकल गेट येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी खासदार खैरे बोलत होते.

या वेळी मंचावर पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार, सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, आमदार संजय शिरसाट, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, माजी महापौर रशीदमामू, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, प्रा. राम बाहेती, सुभाष लोमटे, उद्धव भवलकर, प्रशांत शेगावकर, बाबा तायडे, एकबालसिंग गिल, अफसरखान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आंबेडकर पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी खासदार खैरे म्हणाले, की बाबासाहेबांसारखे महान व्यक्तिमत्त्व जगात पुन्हा घडणे शक्‍य नाही. ते युगपुरुष होते, त्रिकालाबाधित विचार करून त्यांनी घटना लिहिली. ती बदलण्याचा काही लोकांचा प्रयत्न असला, तरी ती गोष्टच अशक्‍यप्राय असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. राम बाहेती म्हणाले, की डॉ. बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठीच काम केलेले नाही, तर शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. संविधानविरोधी घटकांना रोखायचे असेल परिवर्तनवाद्यांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष लोमटे यांनी, संविधानाला धोका निर्माण झाला असून, सर्वांनी याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहा, असे प्रतिपादन केले. कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने जीवन घडविल्याचे सांगितले. औरंगाबादेत डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच शिक्षणाची गंगा वाहत असून, दीन-दलितांवर त्यांचे अनंत मोलाचे उपकार असल्याची कृतज्ञता माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी व्यक्‍त केली. कार्यक्रमात उत्तमसिंह पवार, बाबूराव कदम यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्तविक मिलिंद शेळके यांनी केले.

...तर पोलिसांची गरज नाही - अमितेशकुमार
भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौलिक अशी राज्यघटना दिलेली आहे. घटनेच्या नियमानुसार प्रत्येक नागरिक वागला तर देशात पोलिसांची आवश्‍यकताच भासणार नाही, अशी ही आदर्श राज्यघटना आहे; मात्र आपल्याला राज्यघटनेचा विसर पडला आहे, असे मत पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार यांनी व्यक्‍त केले. प्रत्येक नागरिकाने घटनेचा आदर करून नियमानुसार वागले पाहिजे. घटना बदलणे शक्‍य नसून काही सुधारणा होतील; मात्र घटनेचा मूळ ढाचा तसाच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com