आठ बोगस कर्मचाऱ्यांना अटक

आठ बोगस कर्मचाऱ्यांना अटक

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात झालेल्या बोगस अनुकंपा भरती प्रकरणातील आरोपीची धरपकड सुरू झाली आहे. बोगस नावाने काम करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात 12 अधिकाऱ्यांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला दिली. 

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात 1996 ते 2005 या नऊ वर्षांच्या काळात अनुकंपा भरती झाली. यात दहाहून अधिक कर्मचारी बोगस नावाने एसटी महामंडळाच्या विविध पदांवर रुजू झाले. एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "मोठा व्यवहार' करून या कर्मचाऱ्याचे बोगस कागदपत्रे तयार केले होते. "सकाळ'ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. हे प्रकरण राज्यभर गाजले. मुख्य सूत्रधार दिवंगत भगवान शेनफडू माळकर (वरिष्ठ) हा होता. त्यासह इतरांनी बोगस अनुकंपा भरती केली होती. नोकरी मिळवण्यासाठी या आठ ते दहा जणांनी जमीन, घरे विकले होते. काही दिवस बोगस नावाने काम करा, नंतर सर्व व्यवस्थित करू असे सांगून यांना विविध पदांवर रुजू करण्यात आले होते. 24 सप्टेंबर 2015 ला कोलारकर समितीच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. बोगस भरतीसाठी मदत करणाऱ्या 12 अधिकाऱ्यांचीही नावे समोर आली होती. या बारा अधिकाऱ्यांवर पाच डिसेंबर 2015 ला क्रांती चौक पोलिस ठाण्यात विविध आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठवड्यात बोगस नावाने काम करणाऱ्या आठ जणांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना या प्रकरणात मदत करणाऱ्या 12 अधिकाऱ्यांचेही आरोपपत्र तयार करण्यात आले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे ही अटक लांबणीवर पडली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या बारा अधिकाऱ्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यांना होऊ शकते अटक ! 
लक्ष्मण भारती, मिलिंद बंड, पिचिंद्र श्‍याम बडे, रामकृष्ण चव्हाण, सुरेश खैरे, संजय सुपेकर, सुनील ओहळ, सय्यद अब्दल रहीम, गणेश गुरव, बाजीराव वानखेडे, चिंतामणी साबळे यासह अन्य काही जणांचे आरोपपत्र तयार करण्यात आले असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रकरणाचा तपास क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याप्रकरणी बोगस नावाने काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना आम्ही अटक केली. सध्या ते जामिनावर आहेत. तर त्यांना मदत करणाऱ्या एसटीच्या बारा अधिकाऱ्यांचेही आरोपपत्र तयार असून, त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहेत. 
- एस. बी. आहेर, पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com