साडेआठशे शिक्षकांच्या बदल्या

साडेआठशे शिक्षकांच्या बदल्या

औरंगाबाद - विविध संवर्गातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रविवारी (ता. १६) सुटीच्या दिवशी शिक्षकांच्या हातामध्ये बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि त्यात रविवारी सुटीच्या दिवशी हे आदेश हातात पडले आहेत. ज्यांना मनासारख्या शाळा मिळाल्या ते खुशीत आहेत; मात्र ज्यांना मनासारख्या अथवा सोयीच्या ठिकाणी बदल्या मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. 

शासनाने २०१९ मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी २१ मे आणि २९ मे रोजी पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्याअंतर्गत बदलीप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे, शाळानिहाय रिक्त जागा व समानीकरणासाठी ठेवायच्या अनिवार्य रिक्‍त जागांची शाळानिहाय यादी घोषित करणे; तसेच सदर माहिती संगणक प्रणालीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये मॅप करून व्हेरिफाय करणे. सर्व माहिती अचूक असल्याचे प्रमाणिक करून शिक्षकांना संवर्ग-१ ते संवर्ग-४ साठी बदलीचे फॉर्म भरण्याची सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत कळविले होते; मात्र ही सर्व प्रक्रिया दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी ७ जूनला पत्र काढून याबाबत नाराजी व्यक्‍त करीत ७ जूनच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत लॉगिनमधील बदलीच्या अनुषंगाने सर्व कार्यवाही पूर्ण करून शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. आचारसंहितेमुळे उशिराने सुरू झालेली शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अखेर १६ जूनला संपली. बदली झालेल्या ८५६ शिक्षकांमध्ये ८२७ शिक्षक हे मराठी माध्यमातील, तर २९ शिक्षक हे उर्दू माध्यमातील आहेत. यात संवर्ग-१ मधील ११४ तर संवर्ग-२ मधील १६७ शिक्षकांचा समावेश आहे; तसेच तीन वर्षे अवघड क्षेत्रात सेवा केलेले बदलीस पात्र असलेल्या ४९ शिक्षकांना आता अनुकूल क्षेत्रातील शाळा मिळाल्या आहेत; तर शिक्षक म्हणून दहा वर्षे सेवा झालेल्या आणि यंदा एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण केलेल्या ५२६ शिक्षकांचीही बदली झाली आहे. सोमवारी (ता. १७) शाळा सुरू होणार असून, बदली झालेल्यांना नवीन शाळेत रुजू व्हावे लागणार आहे. 

 विस्थापित शिक्षकांची  संख्या १३८
जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या होताना १३८ शिक्षकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे शाळाच राहिलेली नाही. यामध्ये एक मुख्याध्यापक, १०२ सहशिक्षकांचा तर ३५ पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. औरंगाबाद तालुक्‍यातील २४ , गंगापूर २६, कन्नड ८, खुलताबाद १३, पैठण ४०, सिल्लोड ८, वैजापूर १२  आणि फुलंब्री तालुक्‍यातील सात शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षकांना बदली आदेश मिळाल्यानंतर सोमवारीच संबंधित शाळेमध्ये रुजू व्हावे लागणार आहे. विस्थापित झालेल्या शिक्षकांना आठ दिवसांत रिक्त जागांनुसार समुपदेश करून शाळा देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी एस. पी. जायस्वाल यांनी सांगितले.

तालुकानिहाय बदली शिक्षकांची संख्या 
तालुका    मराठी माध्यम     उर्दू            एकूण
औरंगाबाद    ५९     ०३      ६२
गंगापूर      ११८     ०४            १२२
कन्नड     १५२      ०२      १५४
खुलताबाद    ५१                  ०२             ५३
पैठण    ११६               ०६              १२२
फुलंब्री    ३१                  ०२               ३३
सिल्लोड    ८१                  ०९               ९०
सोयगाव    ५५      ०१      ५६
वैजापूर    १६४     ००     १६४
एकूण    ८२७      २९     ८५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com