'या' शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती

file photo
file photo

नांदेड : 'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर'चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, नांदेड शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

स्वच्छतेवर किती खर्च होतो?
मात्र, नांदेड शहरात निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.

शासनाच्या निधीचा काय उपयोग
सध्या करोना सारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक कोरोना पासून बचावाकरिता सांगण्यात येणाऱ्या उपायांचे नियोजन गांभिर्याने करण्यावर भर देत आहेत. मात्र कोरोनाला रोखण्याकरिता नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना या कोरोनाला रोखण्यास फायदेशीर ठरतीलही. मात्र हेच होत असताना शहरातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे शहरवासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्ची होतो? हे शहराच्या अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.

शासनाने ठोस पावले उचलावीत
तेव्हा नागरिक शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जिवित्वाशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
राज काॅर्नर ते भाग्यनगर पोलिस ठाण्यापर्यंतच्या रोडवर दुर्गंधीयुक्त पाणी कित्येक वर्षांपासून रोडवर वहात असून, तळीरामासह जाणारे-येणारेही रस्त्यावरच लघुशंका करत आहे. परिणामी महिलांना त्याचा त्रास होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी यात लक्ष घालावे.
- अनंतराव करजगीकर (ज्येष्ठ नागरिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com