नवं वर्ष उमेदीचं...

वालसावंगी : परिसरात बहरलेले पीक.
वालसावंगी : परिसरात बहरलेले पीक.

वालसावंगी (ता.भोकरदन) - जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसानंतर यंदा दुष्काळाचा नूर पालटला. शेतीतून फारसे काही हाती आले नाही; पण किमान पुढील काळात पाणीप्रश्‍नापासून सुटका झाल्याचे समाधान आहे. सध्या अस्मानी संकटांचा सामना करीत शेतशिवारही बहरलेले आहेत. आगामी काळात गहू, ज्वारी, हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळण्याची आशाही आहे. जुने सारे विसरून नव्या उमेदीसह शेतकरी, ग्रामस्थ नववर्षाकडे पाहत आहेत, हे विशेष.

वर्ष 2018 हे वर्ष पूर्ण दुष्काळात गेले, ना खरीप, ना रब्बी कोणतेच पीक शेतात आले नाही, परिणामी मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले, चातकासारखी वाट बघूनसुद्धा पाऊस बरसला नाही. यामुळे सगळीकडे तीव्र पाणीटंचाई झाली. शेतशिवारांत ज्याप्रमाणे विदारक चित्र होते; तसेच चित्र गावातसुद्धा बघायला मिळत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी भटकंती झाली होती. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावरसुद्धा वाढलेला वाढला होता.  ना सण ना उत्सव सारेकाही पावसावाचून सुनेसुने झाले होते. त्या सर्व कटू आठवणी बाजूला ठेवून वर्ष 2019 हे वर्ष उजाडले खरे तर गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळी वेदना बाजूला सारून पुन्हा एकदा शेतकरी शेतातील हिरवे रान पिकविण्यासाठी सज्ज झाला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला
उसनेपासने, कर्ज, सावकारी, नातेवाईक मिळेल त्याच्याकडून जमेल त्या प्रकारे पैशांची तजवीज केली. खरीप पिकांची, सोबतच मिरची, फुलशेती, लागवड शेतात केली. सुरवातीला वेळेवर पाऊस बरसल्याने यंदा निसर्ग साथ देणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. खरी मात्र काही दिवसांतच ती साफ फोल ठरली, पिके बहारदार अवस्थेत असताना वालसावंगी परिसरात जो पाऊस सुरू झाला तो शेवटपर्यंत उघडलाच नाही. कधी कमी, कधी जोरात, तर कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सतत परिसरात कोसळतच राहिला. यामुळे अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मका, सोयाबीन पिकाच्या सोंगणीवेळी तर अतिमुसळधार पाऊस कोसळला. नदी-नाले तर कित्येकवेळा खळखळून वाहिले. यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. 

सलग दोन वर्ष कोरडा-ओला दुष्काळ
सलग दोन वर्षी कोरडा आणि ओला दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. पावसाने या वर्षात जो पिच्छा पुरविला तो अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, वर्षाचा शेवट देखील पावसाच्या रिमझिमने झाला आहे. त्यामुळे येणारे 2020 हे वर्ष तरी निसर्गाने मेहेरबान होऊन शेतशिवारांत पिकांचे नंदनवन फुलावे अशीच इच्छा शेतकरी व्यक्त करीत आहे.

वर्ष 2019 हे वर्ष धो-धो कोसळलेल्या पावसामुळे चिरकाळ लक्षात राहील. अगदी पूर्वी कधीही न पडलेला व पाहिलेला पाऊस पडला. शेतशिवारात तर चार महिने विदारक चित्र बघायला मिळाले. आता वर्ष 2020 हे शेतकऱ्यांसाठी सुखसमाधानाचे यावे अशी अपेक्षा आहे.
- रुखमाजी बोडखे,
शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com