Video: भितीपोटी अनेकांनी शेतातच थाटला संसार

file photo
file photo

परभणी :  कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती शहरी भागासह गावकुसावरदेखील पोचली आहे. हा आजार माणसापासून माणसांनाच होत असल्याने माणसे माणसापासून दूर जात आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीपोटी खेडेगावांतील अनेकांनी गावातील घरांना कुलूप लावून शेतात संसार थाटला आहे. परंतु, शेतात महिला मुलांसह वास्तव्य करतांनादेखील सुरक्षिततेची हमी देता येत नसल्याने जीव धोक्यात घालून हे वास्तव्य सुरू आहे.

‘कोरोना’ हे नाव जरी काढल तरी आता कुणाच्याही हृदयाची धडधड वाढयला लागते. कारण हा आजार आहेच तितका भयानक. कारण याची लागण माणसांच्या संपर्कात आल्यानेच होते. त्यामुळे सोशल डिस्टन्‍सिंगचा सर्वांनी वापर करावा, असे वारंवार सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु, याचा वापर अजूनही शहरी भागात म्हणावा तितक्या प्रभावीपणे होतांना दिसत नाही, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. याच्या उलट ग्रामीण भागातील चित्र दिसत आहे. खेडेगावांत लोकसंख्या कमी असतांनादेखील बहुतांश खेडेगावांत सोशल डिस्टन्सिंगचा वापर काटेकोरपणे केला जातोय. याला ग्रामीण भागातील रहिवाशांचे शहाणपणच म्हणावे लागेल. दुपारी ११ नंतर गाव ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सकाळीदेखील शेताला जाणाऱ्या एक - दोघांची वर्दळच गावातील रस्त्यावर दिसत आहे.


शेतातील आखाड्यांवर थाटले संसार
कोरोनाची धडकी लोकांच्या मनात इतकी बसली आहे की, ग्रामीण भागातील अनेकानी तर चक्क गावातील घरांना कुलूप लावून थेट शेतात धाव घेतली आहे. ज्यांना स्वतःची शेती नाही असेच लोक गावातील घरात वास्तव्यास आहेत. गावात लोकांच्या संपर्कात आपले कुटुंब येऊ नये म्हणून खेडेगावांतील लोकांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु, यामुळे अशा कुटुंबांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शेतात राहण्यास गेल्यानंतर तेथे सुरक्षिततेची हमी कशी देणार, असाही प्रश्न पडत आहे.

शेतात सुरक्षितता आहे का?
कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी शेतातील आखाडे गाठले आहेत. अख्ख कुटुंबच शेतात राहण्यासाठी गेल्यानंतर कुटुंबातील महिला - मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर उभाच असतो. दिवसभर कसा ही वेळ जातो. परंतु, रात्रीच्या अंधारात शेतातील श्वापदाची भीती लागूनच असते. यापासून कुटुंबाचा बचाव करण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी लोक वस्त्या सोडून शेतात जाताहेत. मात्र, शेतातील सुरक्षिततेचे काय, असाही प्रश्न समोर येत आहे.

रोजचा किराणा व भाजीसाठी गावात परत
शेतावर राहण्यासाठी गेल्यानंतर कुटुंबातील एका सदस्यास दररोज गावात यावे लागत आहे. कारण खेडेगावात महिन्याचे राशन किंवा किराणा भरून ठेवण्याची पद्धत अद्यापही रूढ झालेली नाही. त्यामुळे दररोजचा किराणा, भाजीपाला घेण्यासाठी गावात यावेच लागत आहे. दिवसभर कुटुंबातील सदस्यांनी शेतातील कामे पूर्ण करायची व एकाने गावात जाऊन साहित्य खरेदी करून आणायचे, असा नित्यक्रम सुरू आहे.

कोरोनाच्या भीतीचे सावट...!
कोरोना विषाणूचा संसर्ग हा माणसापासून होतो, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे घरातील महिलांनी शेतात जाऊन राहूया, असा आग्रहच धरला. या आजाराच्या भीतीपोटीच आम्ही गावातील घर बंद करून शेतात राहण्यासाठी आलो आहोत. जेव्हा ही परिस्थितीत आटोक्यात येईल तेव्हा परत गावाकडे जाऊ.
- मुंजाभाऊ लाड, शेतकरी, जांब ता.परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com