येथील शेतकऱ्यांची हरभरा, गव्हालाच पसंती

PHOTO
PHOTO

कळमनुरी(जि. हिंगोली): परतीच्‍या पावसामुळे शेतीमध्ये असलेला ओलावा पाहता या वर्षी रब्‍बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पेरणीस प्राधान्य दिले आहे. त्‍यामुळे कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा, गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्‍याचे चित्र आहे.

या वर्षी परतीच्‍या पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी नदी, ओढे, नाल्‍यांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्‍ध झाले आहे. त्यामुळे शेतीमध्ये ओलावाही निर्माण झाला आहे. जमिनीत ओलावा असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य देत पेरणीस सुरवात केली आहे, तर सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी सुरू केली आहे.

चाळीस हजार ५६६ हेक्‍टर पेरणीक्षेत्र

कळमनुरी तालुक्‍यातील रब्‍बी हंगामाचे एकूण पेरणीक्षेत्र चाळीस हजार ५६६ हेक्‍टर असून त्‍यापैकी निम्‍म्‍या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यामध्ये हरभरा पिकाचे बावीस हजार ७०९ सर्वसाधारण हेक्‍टरवर पेरणी क्षेत्र आहे. त्‍यामध्ये आत्तापर्यंत जवळपास पंधरा हजार सातशे हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्‍या तुलनेत गव्‍हाचे सर्वसाधारण बारा हजार ५३५ हेक्‍टर क्षेत्रांपैकी आजपर्यंत केवळ दोनशे हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. रब्‍बी ज्‍वारीच्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ९६ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तीळ, करडई, जवस, सूर्यफूल या कडधान्य पिकांचा समावेश असलेल्‍या १६३० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. रब्‍बी हंगामातील मका पिकाचे क्षेत्र १०८ हेक्‍टर असून ४८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गव्हाची पेरणी कमी होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला पसंती दिल्याने हरभरा पिकाचे पेरणी क्षेत्र वाढणार आहे. मात्र, मागील रब्‍बी हंगामाच्‍या तुलनेत गव्‍हाचे पेरणी क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. एकूण रब्‍बी हंगाम पेरणी क्षेत्रापैकी आत्तापर्यंत चाळीस टक्‍के पेरण्या आटोपल्‍या असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग चालवली आहे.

बियाणांची जुळवाजुळव

जिल्हाभरात रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी शेतीची मशागत करत आहेत. बहुतांश कोरडवाहू शेतकरी हरभरा पिकास पसंती देत आहेत. मात्र, परतीच्या पावसात सोयाबीन पिकाने दगा दिल्याने हाती पैसाच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे बियाणे कसे खरेदी करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. काही शेतकऱ्यांनी हातउसणे पैसे घेत बियाणांची जुळवाजुळव चालविली आहे. त्यामुळे हरभऱ्याचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. दुसऱ्या बाजूला तीळ, करडई, जवस, सूर्यफूल या पिकांचा पेरा कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com