माजलगाव : हंगामाच्या सुरुवातीला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल दर असलेली सोयाबीनचा निम्म्यापेक्षाही भाव कमी झाला आहे. परिणामी येथील मोंढ्यात सोयाबीनची आवक घटली आहे. त्यामुळे निम्माही भाव मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत असून त्यांना दर वाढीची प्रतीक्षा आहे.
तालुक्यात खरीप हंगामामध्ये २२ हजार ७१६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. जून महिन्यामध्ये वेळेवर पडलेल्या पावसाने सोयाबीन बहरात होती. त्यानंतर फुलोऱ्यात आलेले सोयाबीनला गरज होती ती पावसाची. परंतु पंधरा ते वीस दिवसांचा खंड पडल्याने सोयाबीन धोक्यात आले. परंतु, मोठी उठाठेव करत शेतकऱ्यांनी पीक जोपासले. नंतर पडलेल्या पावसाने या पीकाला नवसंजीवनी मिळाली. परंतु, काढणीस आलेले पीक पाच ते सहा वेळेस झालेल्या अतिवृष्टीने संकटात सापडले. हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे पूर्णतः नुकसान झाले.
अद्यापही बहुतांश ठिकाणी ओल असल्याने सोयाबीनची काढणी थांबलेली आहे. इतर ठिकाणची सोयाबीन काढणी झाली खरी पण हंगामाच्या सुरुवातीला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला दर निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे.
मोंढ्यात सोयाबीनला ४५०० ते ४८०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करत असून काढलेली
सोयाबीन घरातच ठेवण्यास पसंती देत आहेत. जवळपास एकाही शेतकऱ्याकडे सोयाबीन नसताना मे आणि जून महिन्यात सोयाबीनचा वाढलेला भाव यामध्ये फक्त व्यापाऱ्यांचाच फायदा झाला. तर आता शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आणि निम्यापेक्षाही दर कमी झाले. किमान सात हजार रुपयांपर्यंत तरी दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
'खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर असल्याने सोयाबीनच्या पिकांतून मोठे उत्पन्न अपेक्षीत होते. परंतु निम्म्यापेक्षाही कमी दर आज मोंढ्यात मिळत आहे. या भावात सोयाबीनची विक्री केल्यास उत्पादन खर्च निघणे अवघड आहे. दरवाढ होईल मग सोयाबीन विक्री करायची असे ठरविले आहगे. यासाठी सोयाबीन वेअर हाउसला ठेवले आहे.'
- श्रीराम राठोर, शेतकरी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.