पूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर्क तुटला

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : जिल्‍ह्यात मागील चोवीस तासांत रविवारी (ता.२८) पहाटे आठ वाजेपर्यंत १७.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्‍यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली असून या पावसाने आजेगावजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्‍ह्यात चार दिवसांपासून सलग पाऊस होत आहे. दोन दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे अतिवृष्टी झाली होती. त्‍यांनतर परत सेनगाव तालुक्‍यातील साखरा येथे शनिवारी अतिवृष्टी झाली असून ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शेताला तळ्याचे स्‍वरूप आले

 तसेच आजेगाव येथे ५५ मिलिमीटर पाऊस झाला असून नदी, नाल्यांना पूर आला. आजेगावजवळील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याने पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे गोरेगाव ते सेनगाव जाणारा रस्‍ता बंद झाला असून पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतशिवारात पावसाचे पाणी जमा होऊन शेताला तळ्याचे स्‍वरूप आले आहे. 

कयाधू नदीलादेखील पूर

पेरणी केलेली पिकेही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अनेकांनी दुबार पेरणी केली होती. दरम्यान, हिंगोली शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीलादेखील पूर आल्याचे पाहावयास मिळाले. जिल्ह्यात झालेल्या पावसाने इसापूर धरणात ३८.४२ टक्‍के; तर सिद्धेश्वर धरणात एकूण २७.२२ टक्‍के पाणीसाठा झाला आहे.

जिल्‍ह्यात सरासरी १७.५५ मिलिमीटर पाऊस


मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे: हिंगोली १४.०, खांबाळा ८.०, माळहिवरा ६.०, सिरसम बुद्रुक ३.०, बासंबा ७.०, नरसी नामदेव ९.०, डिग्रस १४.० कळमनुरी १९.०, नांदापूर ३.०, आखाडा बाळापूर २६.०, डोंगरकडा १२.०, वारंगाफाटा १०.०, वाकोडी २६.०,

आजेगाव येथे ५५.० मिलीमीटर पाऊस 

 सेनगाव मंडळ ३०.०, गोरेगाव ९.०, आजेगाव ५५.० साखरा ९९.०, पानकनेरगाव ४४.०, हत्ता ८.० वसमत ३.०, हट्टा निरंक, गिरगाव १५.०, कुरुंदा १०.०, टेंभुर्णी ४.०, आंबा ५.०, हयातनगर २९.० औंढा नागनाथ ९.०, जवळा बाजार ११.०, येहळेगाव २४.०, साळणा ७.०.

बांध फुटून शेतीचे नुकसान

गोरेगाव : गावालगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. येथे झालेल्या अतिवृष्‍टीने पाण्याने भरलेला बांध फुटून त्‍याचे पाणी पेरणी केलेल्या अडबन शिवारातील पिकांसह सिद्धार्थनगर भागात घुसले. पेरणी केलेले शेत खरडून गेले आहे. या बाबत तलाठी श्री. येल्‍लारे यांच्याकडे निवेदन देवून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. 

पुलाची दुरुस्ती करावी

तसेच कडोळी ते गोरेगाव रस्त्यावरील अडबन भागातील पुलाचे नळकांडे बुजल्याने पाणी जमा होऊन आजुबाजुच्या शेतात जात आहे. पूल तत्काळ दुरूस्त करावा, अशी मागणी बांधकाम विभागाचे अभियंता श्री. मोहोड यांच्याकडे विठ्ठल पाटील, विकास पाटील, सखाराम खिल्लारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com