
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत वाढ झाली, तर त्यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जालना : लॉकडाऊन लागू केल्यानंतर होणारे आर्थिक परिणाम मोठे आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासन, प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत वाढ झाली, तर त्यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कधीही लॉकडाऊन लागू होईल अशी अफवा सध्या आसपास पसरवली जात आहे. त्याला टोपे यांनी पूर्ण विराम दिला आहे. जालना येथे रविवारी (ता.२९) पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत श्री.टोपे बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थित होती.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणता ही विचार राज्य शासनाचा नाही. राज्य अनलॉक केले आहे. यापूर्वी लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्याचे आर्थिक परिणाम जाणवले आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जातो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जर डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली. तर त्यावेळी काही उपायोजनात्मक निर्माण घेतले जातील. कोरोनाच्या रूग्णसंख्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनी सध्या शासन, प्रशासनाने कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. सध्या राज्यात लॉकडाउन लागू होणार नाही, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीक केली. कोरोनाच्या काळात कधी बाहेर न पडणारे आता पदवीधर निवडणुकीसाठी बाहेर पडले आहेत. आणि त्यांना दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार असे वाटते. परंतु रावसाहेब दानवे यांच्या त्या बोलण्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. तसेच पवार कुटुंबातील कोणता सदस्य मुख्यमंत्री होणार संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानालाही अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे आमदार श्री.पवार यांना म्हटले. तसेच राज्य पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकाजुटीने काम करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुतंशी उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ही आमदार श्री.पवार यांनी व्यक्त केला आहे.
संपादन - गणेश पिटेकर