हताश शेतकऱ्याने सोयाबीन जाळले

हताश शेतकऱ्याने सोयाबीन जाळले

मुखेड  (जिल्हा नांदेड) : परतीच्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबीनच्या शेंगा गळून जाऊन फक्त काड्याच उरल्या. सोयाबीन पिकावर केलेला खर्चही निघत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्याने चक्क दोन एकरमधील सोयाबीन अक्षरशः जाळून टाकले.

मुखेड येथील राजकुमार बापूराव इंगोले या शेतकऱ्यांने नगदी पीक म्हणून आपल्या दोन एकरात सोयाबीन पिकाची लागवड केली. पण परतीच्या पावसामुळे हे पीक बऱ्याच प्रमाणात वाहून गेले. तर शेताला चारही बाजूंनी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे शेतात जाता येत नाही. असलेले थोडेफार सोयाबीनही चिखलात रुतून बसल्यामुळे ते बाहेर काढताही येत नाही. अशा अवस्थेत सोयाबीन असल्यामुळे कोणता मजूरही सोयाबीन काढणीला सहसा धजावत नाही. 

त्यामुळे सोयाबीन जाग्यावरच सडत असल्यामुळे त्याच्या वासाने रानडुकरे येऊन धुडगूस घालत आहेत. फिरून फिरून एखादा मजूर मिळालाच तर तो दोन एकर शेतातील सोयाबीन काढणीला एकरी चार हजार रुपये मागत आहे. सुरवातीपासून या पिकाला जवळपास बारा ते तेरा हजार रुपये लागवड, फवारणी, खत, निदंण यासह इतर खर्च आलेला असून आता काढणीला एवढा खर्च परवडणारा नाही. तर खर्च करूनही केलेला खर्च निघत नसल्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन जाग्यावरच जाळून टाकले.

सोयाबीन चिखलात रुतले
सुरवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतातील सोयाबीन चांगले आले होते. पण ऐन काढणीच्या वेळेतच परतीच्या पावसामुळे आहे ते सोयाबीन चिखलात रुतून बसल्याने प्रत्येक झाडाला चार-पाचच शेंगा उरल्या. त्यातही मजूर एकरी चार हजार रुपये काढणीला मागत असल्याने त्यावर केलेला खर्चही निघत नसल्यामुळे दोन एकरमधील सोयाबीन जाळून टाकवे लागले.
- राजू इंगोले, शेतकरी.

कुटारचा प्रश्न गंभीर

पंधरा दिवसांपासून दररोज होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व सुख हिरावून घेत मुख्य सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले आहे. जनावरांचा मुख्य चारा, सोयाबीनचे कुटारही सततच्या पावसाने भिजून गेल्याने खाण्यायोग्य नसल्याने मुखेड तालुक्यासह परिसरात पशुपालकांंच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक म्हणून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. हाताशी आलेल्या सोयाबीन काढण्याच्या वेळी पंधरा दिवस अवकाळी पावसाने थैमान घालते, शेतकऱ्यांचे सर्व सुख हिरावून घेत अडचणीत आणले. पूर्वी जनावरांच्या चाऱ्यासाठी पशुपालक मक्का, ज्वारीचा वापर केला जात आहे. पण आता ज्वारी, मक्का पिकाची पेरणी संपल्यात बघायला मिळत आहे. शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करीत असल्याने सोयाबीन मळणी यंत्राने काढण्यावर कुटारही जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगी पडत असल्याने पशुपालक कुटारचा पाण्यापासून बचाव करीत झाकून, कोठ्यात साठवून ठेवित होते. या वर्षी अवकाळी पावसाने थैमान घातले असल्याने सततच्या पावसामुळे हवेमुळे सोयाबीन पलटी करणे, महागामोलाच्या ताडपत्री टाकणे सर्व निकामी झाले असल्याने सोयाबीनच्या काडाचाच चिखल झाला असल्याने सोयाबीनसह कुटारचा प्रश्न गंभीर बनला आहे.
 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com