मुबलक पाण्यावर घेतले भुईमुग, टरबूज, पण तरीही शेतकरी अडचणीत 

tarbuj
tarbuj

परभणी ः यंदा पाण्याची सोय झाल्याने मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या स्थानिक टरबुजांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी कोरोनामुळे ग्राहक नसल्यामुळे टरबूज उप्तादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दहा रुपये किलोप्रमाणेदेखील टरबूज कोणी घ्यायला तयार नसल्याने टरबूज काढण्याचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यात जायकवाडीसह दुधनाच्या पाण्यावर भुईमुगाचे पीक जोमात आले आहे. परभणी, पूर्णा, पाथरी तालुक्यात यंदा भुईमुगाची मोठी पेरणी झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही शिवारे हिरवीगार दिसत आहे. सध्या निंदणीच्या कामाने वेग घेतला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळी टरबुजाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विशेष: गोदावरी खोऱ्यातील टरबुजाला मोठी मागणी असल्याने पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या तालुक्यात दरवर्षी टरबुजाची लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून ओळख असणारे हे फळपीक उत्पनाच्या बाबतीत विश्वसनीय नसते.

धोका पत्करून टरबुजाची लागवड 
अवकाळी पाऊस अथवा गारपीट झाल्यास हे पीक लगेच नुकसानीला बळी पडते. तसेच बियाणात त्रुटी निघाल्यास किंवा मध्येच एखादी कीड पडल्यास लागलीच हे पीक नष्ट होते. त्यामुळे मोठा धोका पत्करून शेतकरी टरबुजाची लागवड करतात. टरबुजाचे बियाणे शेतकरी स्वतः ठेवत नसल्याने लागवडीसाठी विविध कंपन्यांचे महागडे बियाणे विकत घ्यावे लागते. यंदा जिल्ह्यात पाण्याची मुबलक सोय झालेली आहे. 

लॉकडाउनमुळे टरबुजाची विक्री मंदावली
जायकवाडीसह अन्य प्रकल्पांतून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी बागायती पिके घेतली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात टरबुजाची लागवड झाली आहे. त्यामुळे महिनाभरापासून टरबुजाची आवक सुरू झाली आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे फार कमी लोक घराबाहेर पडत असल्यामुळे टरबुजाची विक्री मंदावली आहे. त्यात विकण्याच्या प्रश्न येत असून व्यापारीदेखील खरेदी करत नसल्याने टरबूज उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. 

 

जायकवाडीतून पाणी सोडल्याने उन्हाळी पिकांची लागवड
परभणी जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, मागील तीन ते चार वर्षांपासून जायकवाडी धरणात पाणीसाठी नसल्याने जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र घटले होते. धरणच कोरडे असल्याने मराठावाड्यातील तीन जिल्ह्यांत पिकासाठी पाणी सोडणे बंद झाले होते. परभणी जिल्ह्याच्या पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यात जायकवाडीचे लाभक्षेत्र आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांसह अन्य पिके घेता येतात. तसेच उन्हाळी भुईमूग या पिकाचेदेखील उत्पन्न घेतले जाते. गतवर्षीपासून जायकवाडी धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करत आहेत. 

या भागात भुईमुगाच्या निंदणीचे काम सुरू
यंदाही हिवाळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडल्याने जिल्ह्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच दुधना प्रकल्पातूनही नदी आणि कालव्यात पाणी सोडले जाते असल्याने त्या पाण्याचा आधार घेत विहिरींच्या पाण्यावर भुईमुगाची लागवड झालेली आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी, पूर्णा तालुक्यातील लिमला, ताडकळस, फुलकळस, या भागात सध्या भुईमुगाच्या निंदणीचे काम सुरू आहे. सर्वत्र शिवार हिरवेगार झाले असून कुठे पाणी देण्याचे, तर कुठे खुरपणीचे काम सुरू आहे. भुईमुगापासून उत्पन्न आणि गुरासाठी चारा निर्माण होतो. त्यामुळे बहुतांष शेतकरी पाणी असल्यास हमखास भुईमुगाची लागवड करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com