`हे’ नागरिक आहेत देशाची संपत्ती, कोणते? ते वाचाच

File photo
File photo

नांदेड : काळ बदलला असून महिलांनी पाठीमागे राहून चालणार नाही. आतापर्यंत रांधा, वाढा आणि उष्टी काढा, यातच आपला वेळ गेला आहे. हे जन्मतःच महिलांच्या वाट्याला आलेले आहे. हे टाळून चालणार नाही. पण आता काळाबरोबर महिलांनी देखील बदलले पाहिजे. विशेषतः ग्रामीण ज्येष्ठ महिलांनी आज संघटित होण्याची आज गरज आहे.

आजपर्यंत आपल्या देशात संस्कृतचे जतन हे महिलांनीच केले आहे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ असून, भारतीय संस्कृतीत महिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण इतिहास पाहिल्यास स्त्रीला आदीशक्ती असे म्हटले आहे. नवरात्र महोत्सवात आपण या आदिशक्तीची पूजा आणि आराधना करतो. ही शक्तिपीठे विशेषतः महाराष्ट्रात आहेत. भारतीय संस्कृती पुरुषप्रधान असली तरी, एकट्या पुरुषाला किंवा एकट्या स्त्रीला समाजात महत्त्व नाही. स्त्री आणि पुरुष यांना समान संधी उपलब्ध आहे. तरी पण पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याने स्त्रियांना स्वतंत्रपणे काम करणे अवघड आहे. काळ झपाट्याने बदलत आहे. थांबला तो संपला, याप्रमाणे स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने काम केले पाहिजे.

समुपदेशन गरजेचे
ग्रामीण स्त्री ही आजही परंपरागत ओझ्याखाली दबलेली आहे. तिच्यात जाणीवजागृती होणे महत्त्वाचे आहे. ती जाणीवजागृती आपणास ज्येष्ठ महिलांचे संघ स्थापन करून प्रबोधनाद्वारे करता येऊ शकते. तसेच समाजात अनेक कुटुंबांत कलह आहेत. अनेक स्त्रिया परित्यक्त्या व विधवा आहेत. त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे वाटते. आजही शासकीय सुविधा त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत. ग्रामीण स्त्रीने सध्याच्या काळामध्ये पाठीमागे राहून चालणार नाही. त्यासाठी सर्व महिलांनी संघटीत होणे आवश्‍यक आहे असे मत ‘फेस्कॉम’ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डी. के. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

महिलांनी संघटित व्हावे
सद्यस्थितीत वर्तमानपत्रे, रेडिओ आणि दूरचित्रवाहिनीच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या तर अनेक महिला, मुली, अन्याय, अत्याचार, हुंडाबळीच्या शिकारी होत आहेत. या सर्वां मुकाबला करावयाचा असेल, तर महिलांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण महिलांच्या समस्या या शहरी महिलांपेक्षा भिन्न आहेत. शहरामध्ये यांत्रिकीकरणामुळे अनेक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात जाणीवजागृती झालेली आहे. त्या आपल्या हक्कांबाबत जागरुक झालेल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील महिला या जनजागृती अभावी हक्कांपासून कोसोदूरच आहेत.

ज्येष्ठ नागरिकच देशाची संपत्ती
आज प्रत्येक क्षएत्रात स्त्रिया काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, संशोधन, हवाई आदी क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. पण तुलनात्मकदृष्ट्या ग्रामीण महिलांचे प्रमाण त्यात कमी आहे. वास्तविक ज्येष्ठ महिलांचा अनुभव, त्यांचे ज्ञान, कौशल्याचा फायदा कुटुंबासोबतच समाज आणि देशालाही झाला पाहिजे. यासाठी शासन स्तरावरूनच पावले उचलण्याची गरज वाटते. कारण ज्येष्ठ नागरिकच देशाची संपत्ती आहे.
- डी. के. पाटील, अध्यक्ष (फेस्कॉम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com