सावधान...! मुलांच्या भावविश्‍वातील खदखद घ्या जाणून 

File photo
File photo

नांदेड : कधी परीक्षा फीसच्या कारणावरून, कधी सायकल, मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून तर कधी गरिबीला कंटाळून अशा विविध कारणांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण अलिकडे वाढत चालले आहे. परिणामी आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यूला कवटाळू लागल्याच्या धक्कादायक घटनांचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याने मुलांच्या भावविश्‍वात नेमकी काय खदखद चालली आहे, हेच मानसोबचारतज्ज्ञांसोबतच पालकांनाही समजेनासे झाले आहे.

उमलत्या वयातील मुलांत वयोमानानुसार होणारे बदल, पुरेशा ज्ञानाअभावी त्यातून निर्माण होणारे भिन्नलिंगी आकर्षण आणि त्यातील धोके, पालकांनी पुरविलेले हट्ट आणि त्यातून निर्माण होणारा बेदरकारपणे, पालकांनाही नकळत मुलांचे सुरु असलेले उद्योग असे अनेक प्रश्‍न आज इंटरनेटच्या नव्या जगात निर्माण झाले आहेत. पालकांना यातील अनेक प्रश्‍नांची जाणीवही नसते. पण जेव्हा अचानक प्रश्‍न समोर येतो, तेव्हा मात्र ते गांगरून जातात. मुले अशी का वागली? मी तर त्याचे सर्व लाड पुरवत होतो. मुलीला शिक्षणासाठी स्वातंत्र्य दिले होते. तरीही त्यांनी असे पाऊल का उचलले, अशा अनेक प्रशनांच्या गुंत्यात आज पालक अडकलेले आहेत.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुंबातील वडिलांना नाही सांगण्याची वेळच येत नसे. घरातील प्रमुख व्यक्ती, आजी-आजोबा किंवा चुलता-चुलती हेच मुलांचे बरेचसे प्रश्‍न सोडवून टाकत असत. तिथेच मुलांना सावधानतेचा धडा मिळत असे. त्यातून आपल्या एखाद्या कृतीने घरातून नकार मिळू शकतो, ही जाणीव त्यांच्यात निर्माण होत असे. आपण फालतू लाड केलेले चालणार नाही. याची जाणीवही मुलांना आपसूकच होत असे. त्याचा मुलांची जडणघडण होण्यात मोठा फायदा होत होता. आपल्याला विचारणारे कुणी तरी आहे किंवा आपण असे केले तर आपल्या वडिलांना समजू शकते, ही भीती मुलांमध्ये होती. परंतु,  बदलत्या काळानुसार तसेच बदलत्या जीवनशैलीने चौकोनी कुटुंबातील पाल्यांशी बोलायलाही पालकांना आज वेळ मिळत नाही. यातूनच मग मुले न बोलता आपल्याच दुनियेत मश्‍गूल राहतात. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ नेमकी काय करते आहे हे आई वडिलांना कळतच नाही. 

पाल्यांशी संवाद वाढविण्याची गरज
अशा घटनांतून सावरण्यासाठी पालकांनी सर्वप्रथम पाल्यांशी संवाद वाढविण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्‍न, त्यांच्या अडचणींबाबत प्रेमाने, आपुलकीने चर्चा करावी. ‘तो’ किंवा ‘ती’ वयात येत असल्यास मुलाशी वडिलांनी आणि मुलीशी आईने मोकळेपणाने संवाद साधावा. मध्यमवर्गीय कुटुंबात आजही निषिद्ध मानल्या गेलेल्या लैंगिक विषयावर मुलांशी मोकळेपणाने बोलावे, मुलाला मोबाईल दिला असेल तर तो किती वेळ त्याच्यात गुंतत आहे, हेही पाहावे. त्याला प्रेमाने यातील धोके समजवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणचे त्याला नकार पचवायला शिकवा. यातून एक परिपक्व व्यक्तिमत्व घडण्यास मदत होईल.
- डॉ. अविनाश सरोदे (मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com