उस्मानाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी (ता. नऊ) अतिवृष्टी झाली. त्यामुळे ओढे-नाल्यांचे पाणी शेतात घुसून अनेकांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले. याची पाहणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली. त्या आधारे जिल्हा प्रशासनाने कृषी विभाग आणि महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मेंढा, लासोना, सांगवी, बोरखेडा, कनगरा, बोरगाव (राजे), घुगी, पाडोळी, कामेगाव तसेच समुद्रवाणी या नुकसानग्रस्त भागाची खासदार राजेनिंबाळकर यांनी शनिवारी पाहणी केली. पावसामुळे काहींच्या घरांची पडझड झाली. रस्त्यावरील जुने पूल व बंधारे वाहून गेले. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे, अशी सूचना खासदार राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी यां पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना काही अडचण आल्यास खासदार संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही खासदार राजेनिंबाळकर यांनी केले.
दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरूच
अतिवृष्टीमुळे ओढे, नाल्यांना पूर आला होता. यामध्ये लासोना येथील बबन रसाळ (वय ४२) व कनगरा येथील समीर शेख (वय २७) हे दोघे शुक्रवारी रात्री वाहून गेले. त्यापैकी शेख यांचा मृतदेह सापडला. रसाळ यांचा अद्यापही शोध सुरू आहे. जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर त्यांचा शोध घेत आहे.
या गावांत झाले नुकसान
तुळजापूर तालुक्यातील सलगरा, इटकळ, जळकोट, मंगरूळ, परंडा तालुक्यातील आसू, जवळा, अनाळा, सोनारी, उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळिंब, गुळज, लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी व उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.