नांदेड, परभणी, हिंगोलीत प्रथमच दमदार पाऊस

सहस्रकुंड ः नांदेड जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे शनिवारी टिपलेले दृश्‍य. (छायाचित्र ः प्रमोद जाधव)
सहस्रकुंड ः नांदेड जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे शनिवारी टिपलेले दृश्‍य. (छायाचित्र ः प्रमोद जाधव)

नांदेड/औरंगाबाद - नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. दोन) रात्री उशिरा प्रथमच दमदार पाऊस झाला. नद्या, नाले खळाळले. काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. उर्वरित पाच जिल्ह्यांत मात्र रिमझिम ते शिडकावा असेच पावसाचे स्वरूप होते. आता होत असलेल्या पावसामुळे पिकांना टवटवी मिळत असली, तरी जलसाठ्यांना संजीवनीसाठी सर्वदूर, सातत्यपूर्ण जोरदार पावसाची गरज आहेच. 

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या सर्व तालुक्‍यांत काल रात्री दमदार पाऊस झाला. किनवट, हदगाव, हिमायतनगर तालुक्‍यांत अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पाणी आले. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 52.70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी 88.71, हदगाव- 67.71, हिमायतनगर तालुक्‍यात 92.67 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 37.44 टक्के पाऊस झाला.

 नायगाव शहरासह तालुक्‍यात आजही पाभस कायम होता. माहूर येथे मुसळधार सरी कोसळल्या. निवघा बाजार परिसरात झालेल्या दमदार पावसाने कयाधू नदीला पाणी आले. वरुला (ता. हदगाव) येथील पूल वाहून गेल्याने शेतात पाणी घुसले. बिलोली तालुक्‍यातील कासराळी-बेळकोणीदरम्यान नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. शिरड येथील पुलावर पाणी आल्याने मनूला, माटाळा, शिरड या गावांचा संपर्क तुटला. पळसा-केदारनाथ मार्गही बंद होता. सहस्रकुंड धबधबा कोसळू लागला. शिरड येथील पुलावर पाणी आल्याने एका रुग्णाला ट्रॅक्‍टरवर बसून पूल पार करावा लागला. 
 

या मंडळांत अतिवृष्टी 
जिल्ह्यातील 17 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मडळे व कंसात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः किनवट तालुक्‍यातील बोधडी (173), जलधारा (129), शिवणी (107), इस्लापूर (105). हिमायतनगर (102), सरसम (96), जवळगाव (80), हदगाव तालुक्‍यातील तळणी (87), निवघा (82), आष्टी (68), हदगाव व मनाठा (प्रत्येकी 65),
माहूरमधील वानोळा (166), नांदेड तालुक्‍यातील निमगाव, तुप्पा (प्रत्येकी 67), वसरणी (65), भोकरमधील किनी (70). 
 
परभणी सर्वदूर दमदार 
परभणी : अनेक दिवसांपासून केवळ रिमझिम हजेरी लावणाऱ्या पावसाने काल रात्री उशिरा प्रथमच सर्वदूर दमदार हजेरी लावली. आज पहाटे पावसाचा जोर वाढला होता. चुडावा (ता. पूर्णा) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः परभणी- 33.50, गंगाखेड- 30.50, पूर्णा- 49.40, जिंतूर- 34.17, पालम- 29.67, सोनपेठ- 22, पाथरी- 14.33, मानवत- 28, सेलू- 28.60. एकूण सरासरी 29.99. 
 
चौदा गावांचा संपर्क तुटला 
हिंगोली : या जिल्ह्यातही प्रथमच काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 55.32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कळमनुरी, नांदापूर, आखाडा बाळापूर, वाकोडी, आजेगाव या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. कयाधू, पैनगंगा, जलेश्‍वर नद्यांना यंदा पहिलाच पूर आला. कळमनुरी तालुक्‍यातून वाहणाऱ्या या नदीच्या पुरामुळे डोंगरगाव येथील मंदिर पाण्याखाली आले होते. कळमनुरी ते सांडस व हिंगोली ते समगा मार्गावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील तेरा गावांचा संपर्क तुटला आहे. पैनगंगा नदीच्या बॅक वॉटरमुळे वाकोडीजवळील ओढ्याला पूर आल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. हिंगोली ते परभणी मार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी गेल्याने दीड तास वाहतूक विस्कळित होती. 
 
लातूरमध्ये 30 मिमी पाऊस 
लातूर ः जिल्ह्यात दोन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर काल रात्री सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर हा पाऊस कोसळत होता. यंदाच्या हंगामात हा सर्वांत मोठा तीस मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. नदी-नाल्यांना पहिल्यांदाच पाणी आले. सर्वाधिक 36.33 मिलिमीटर देवणी, तर सर्वांत कमी 16.13 मिलिमीटर पाऊस लातूर तालुक्‍यात झाला. आतापर्यंत झालेला पाऊस वार्षिक सरासरीच्या 27.72 टक्के आहे. आज दिवसभर रिपरिप सुरू होती. काही भागांत खोळंबलेल्या पेरण्यांना सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 
 
जालन्यात रिमझिमच 
जालना : जिल्ह्यात केवळ रिमझिम सुरू असून सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. आज सकाळपर्यंतच्या 24 तासांत सरासरी 9.90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मिलिमीटर असून आतापर्यंत 247.94 मिलिमीटर पाऊस झाला आहे. औरंगाबाद शहरात आजही अधूनमधून शिडकावा होत होता. किरकोळ अपवाद वगळता बीड जिल्ह्यात आज पाऊस झालेला नाही. 
 
उस्मानाबादेत भीजपाऊस 
उस्मानाबाद ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात भिजपाऊस होत आहे. खरीप पिकांना टवटवी मिळाली असली, तरी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होईल, असा एकही मोठा पाऊस आतापर्यंत झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कायम आहे. आतापयर्यंत खरिपाची 94 टक्के पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com