हिंगोलीत ८१ योद्ध्यांनी कोरोनाला हरविले

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी अखेर कोरोनाला हरविले आहे. यातील ३३ रुग्णांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी (ता. १५) त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याने आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबवित कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्नाची बाजी लावली. त्यामुळे पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांनी आनंद व्यक्त केला होता.

एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण 

मात्र, हा आनंद जास्त काळ राहिला नाही. मुंबई, मालेगाव येथे बंदोबस्तावरून आलेल्या एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल रेडझोनकडे चालली होती. एसआरपीएफ जवानांसह इतर सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्याची वाटचाल शतकाकडे चालली होती. 

तब्बल ३३ रुग्ण कोरोनामुक्त

मात्र, पुन्हा प्रशासन, आरोग्य विभागाला कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले. आरोग्य विभागाच्या अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ८१ रुग्ण कोरोनामुक्त होण्यास मदत झाली. शुक्रवारी यातील तब्बल ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात ‘एसआरपीएफ’च्या ३२ जवानांचा समावेश असून एका अधिपरिचारीकेचा समावेश आहे.

नऊ जवानांवर औरंगाबादेत उपचार

 त्यामुळे आता केवळ दहा कोरोनाबाधित रुग्ण असून यातील नऊ एसआरपीएफ जवानांवर औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू झाली असून आनंद व्यक्त केला जात आहे.

२५ संशयितांचा अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ४२५ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तयापैकी एक हजार ३११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एक हजार ३१६ संशयितांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शंभर संशयित रुग्ण भरती असून २५ जणांचे अहवाल येण्याचे प्रलंबित आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

कोरोनाला हरविण्यासाठी जिल्हाप्रशासनासह पोलिस, स्वच्छता विभागासह आरोग्य विभाग रात्रंदिवस परिश्रमघेत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याने आतापर्यंत तब्बल ८१ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. रुग्ण बरे होत असल्याने डॉक्टरांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे दिसून येत आहे.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन 

जिल्ह्याची वाटचाल ग्रीनझोनकडे होत असली तरी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सोशल डिस्टनिंगचे पालन करावे, अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.     
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com