हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी

santra nuksan
santra nuksan

हिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्‍यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्‍वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्‍ह्यात पाऊस झाला होता. त्‍यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने पिकांची चांगलीच वाट लागली आहे. 

जिल्‍ह्यात मागच्या आठवड्यापासून अधून-मधून पाऊस होत आहे. बुधवारी (ता.१८) तसेच गुरुवार (ता.१९) सलग दोन दिवस पाऊस झाला. त्‍यानंतर मंगळवारी (ता.२४) पाऊस झाला आहे. आता परत  बुधवारी पावसाने हजेरी लावली. बुधवारी हिंगोली शहरात रात्री साडेअकरा ते बारा या वेळात मेघगर्जना व वाऱ्यासह पाऊस झाला.

जोराच्या वाऱ्यासह काहीवेळ पाऊस

तसेच तालुक्‍यातील अंधारवाडी, कोथळज, भांडेगाव, साटंबा, कारवाडी, सावरखेडा, बांसबा, सिरसम, फाळेगाव, खांबाळा, पांगरी, नांदूरा, बोराळा, नरसी नामेदव, सवड, केसापूर, वैजापूर, पहेणी, कडती, डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव आदी गावांत वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा, जवळा पांचाळ, वारंगाफाटा, तोंडापूर, चुंचा, फुटाणा, आखाडा बाळापूर, शेवाळा, डोंगरगाव, पोतरा, निमटोक, कवडा, तेलंगवाडी, बोल्‍डा, येहळेगाव, असोला आदी ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह काहीवेळ पाऊस झाला. 

गहू, हरभरा व ज्वारी पिकाचे नुकसान

सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव, साखरा, सवना, केंद्रा बुद्रुक, पळशी, बटवाडी, जवळा बुद्रुक, देऊळगाव जहागीर, वसमत तालुक्‍यातील गिरगाव, खाजमापुरवाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्डी बुद्रूक, डिग्रस खुर्द, कुरुंदा, कोठारी, पांगरा, वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, हयातनगर, औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगाव, गोजेगाव, साळणा, येळी, केळी, जवळा बाजार भागातही पाऊस बरसला. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. 

केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

शेतात उभे असलेली पिके आडवी पडली. सध्या कोरोनाच्या धास्‍तीने शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पीक काढण्यास अडचणी येत आहेत. त्‍यातच वातावरणातील बदल, पाऊस, वारे यामुळे देखील पिकांचे नुकसान होत आहे. या पिकांसह फळबागेचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. वसमत तालुक्‍यातील गिरगाव, कळमनुरी तालुक्‍यातील वारंगा परिसरात केळीचे पीक परिपक्‍व झाले आहेत. मात्र केळीचे व्यापारी खरेदी करीत नसल्याने पीक शेतात उभेच आहे. या पिकाचे बुधवारी झालेल्या वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. 

गारपीटीमुळेही शेतकऱ्याचे नुकसान

तसेच हिंगोली तालुक्‍यातील भांडेगाव, साटंबा, नरसी, केसापूर आदी भागातील संत्रा पिकाचे देखील नुकसान झाले आहे. वाऱ्याने झाडांची संत्रे गळून पडली आहेत. यासह आंब्याला आलेला मोहर देखील वाऱ्यामुळे गळाला आहे. पंधरा दिवसात चार वेळेस झालेल्या पाऊस, वारे व गारपीटीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीपा बरोबर रब्‍बी व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतऱ्यांवर दुहेरी संकट आल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com