हिंगोली - शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी सरकारी मदतीची रक्कम मागितली असताना ती देण्याबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, 2015 मध्ये हिंगोली तालुक्यातील आंबाळा तांडा येथील वामन जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. सरकारकडून पीडित कुटुंबाला 31 हजार रुपये रोख व 69 हजार रुपये मुदत ठेवीच्या स्वरूपात देण्यात आले होते. त्यानंतर या कुटुंबातील वामन जाधव यांचा मुलगा संजय जाधव यांनी 31 ऑक्टोबर 2017 रोजी तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता. आईच्या वैद्यकीय उपचारासाठी सरकारच्या ठेवीची रक्कम मिळावी, असे या अर्जात म्हटले होते. अर्ज व विनंती करूनदेखील त्याबाबतीत कार्यवाही झाली नाही. या प्रकाराला कंटाळून 9 नोव्हेंबरला संजय यांनी विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान, 10 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून या आत्महत्येला तहसीलदार जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
विलंबाने कार्यवाही केल्याने कारवाई
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता तहसीलदार गजानन शिंदे यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी अर्जदारास पत्र दिल्याचे स्पष्ट झाले. एकूणच तहसीलदार गजानन शिंदे यांनी दहा दिवस विलंबाने कार्यवाही केली व संवेदनशीलतेने प्रकरण हाताळले नाही म्हणून त्यांना निलंबित केले जात असल्याचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आदेशात म्हटले आहे.
|