Video - आशादायी : महिन्यानंतर बाजारपेठेत वाढली शेतकऱ्यांची वर्दळ

Nanded News
Nanded News

नांदेड : लॉकडाउनमुळे जवळपास महिनाभर औषध विक्रेते, किराणा दुकानांव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी रोडावली होती. शेतीची कामेही खोळंबल्याने शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने शेतीशी निगडीत दुकानांना लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली. त्यामुळे संत कृपा मार्केट, तारासिंग मार्केट, महावीर चौक परिसरात शेतकऱ्यांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्च २०२० पासून देश लॉकडाउन केला आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक वगळता सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली होती. आजूनही सर्वप्रकारची दुकाने बंदच असून, शेतीशी निगडीत असलेली दुकाने उघडी ठेवण्यास लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे महिनाभरानंतर शेतीशी संबंधीत साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची वर्दळ नांदेडच्या बाजारपेठेत बघायला मिळत आहे. 

‘डायल कॉन्फरन्स’द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड, आरोग्य केंद्र आखाडा बाळापुर आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ‘डायल कॉन्फरन्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘कोविड१९’च्या पार्श्वभूमीवर अत्यंत सावधगिरीने शेतकऱ्यांनी शेतात काम कसे करावे, खरीप पूर्व हंगामासाठी उपाय योजना याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख डोंगरगावकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

हळद पिकांचे व्यवस्थापन कसे  करायचे?  हळद लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करुण घेणे कसे महत्वाचे आहे? हळद पिकाची बीज प्रक्रिया कशी करावी? शासकीय योजना कशा मिळवाव्यात आदींचीही माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

शेतीकाम करताना स्वतःची काळजी आवश्‍यक
आरोग्य केंद्र आखाडा बाळापुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी माने यांनीही कोरोना आजाराविषयी सखोल मार्गदर्शन केले. आपल्यातील रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सकस आहाराशिवाय नियमित योगा, प्राणायाम करणेही अत्यावश्‍यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवावा. शेतात काम करताना स्वतःची सुरक्षा महत्त्वाची असून, मजुरांच्याही सुरक्षेकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. शेतातून घरी गेल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे, तसेच अंगावरील कपडे देखील लगेच धुवून स्वच्छ कपडे परिधान करण्याचेही आवाहन डॉ. माने यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

शेतकऱ्यांची होरपळ थांबेना
‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील धान्य खरेदी - विक्री प्रशासनाने बंद केली होती. यानंतर काही दिवस बंद राहिलेला नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार १३ एप्रिलपासून सुरू झाल्याने १५ ते २१ एप्रील दरम्यान सात हजार ६६८ क्विंटल हळदीची आवक झाली. तसेच सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर आदी शेतमालही मोंढा बाजारात येवू लागला. परंतु बुधवारी (ता. २२ एप्रिल २०२०) सकाळी जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने बाजार पुन्हा बंद झाला. रस्त्यांची अडवणुक झाल्याने शेतमालही शेतकऱ्यांच्या घरातच राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com