"शेततळं भरावं की मालाला पाणी द्यावं?' 

shettala
shettala

औरंगाबाद : शेततळं तयार करून चार पैसे पिकातून मिळतील असं वाटलं होतं. त्यासाठी जवळचे होते नव्हते ते दीड लाख रुपये तळं तयार करण्यासाठी घातलं. या वरीस तळं तयार झाल्यानं लई आनंद झाला व्हता बगा. आता जमीन बागाईत होईल असं वाटलं; पण झालं उलटंच, जवळ पावसाचा पत्त्याच नसल्यानं विहीर उपशावर आली. शेततळं भरावं तर पिकं वाळायला लागली. तूर, कपाशी, मका, बाजरी जगविण्यासाठी पिकाला पाणी दिलं. तरीही पाणी पुरलं नाय. यंदा शेततळं भरावं की मालाला पाणी द्यावं अशा कचाट्यात अडकलो... बकापूर (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी किशोर जाधव आपली व्यथा सांगत होते.

"माझ्याकडं बारा एकर जमीन आहे. जमिनीत बागायती पिके घेता यावीत, यासाठी यंदा 30 गुंठ्यांत शेततळं तयार केलं. यासाठी शासनाकडून 2 लाख रुपये मिळाले. उर्वरित 1 लाख 60 हजार रुपये खिशातून टाकले. 30 गुंठ्यांत 30 फूट खोल असलेलं शेततळंही तयार झाले. खरिपात बाजरी, मका, कपाशी, टोमॅटोची लागवड केली; मात्र पाऊसच नसल्याने विहिरीचे पाणी या सर्वच पिकांना द्यावं लागलं. विहिरीनं तळ गाठला. आता विहीर उपशावर आल्यानं शेततळं भरता येणार नाही. बाजरी, मका काढल्यावर कसंबसं दोन विहिरींची दोन दिवस मोटार चालवली. 30 फुटांचं शेततळं सहा फूट भरलं; पण त्याचाही काय उपयोग दिसत नाही. तूर, कपाशी वाळून गेली. टोमॅटोला भावच मिळाला नाय. आता विहिरीत पाणी नाही. शेततळ्यात पाणी नाही आणि शेतही कोरडं पडलं... असं सांगताना जाधव यांचा चेहरा गंभीर झाला होता. 

जवळच्या पळशी गावातील स्थितीही काही वेगळी नाही. तेथील रामेश्‍वर पळसकर यांचीही हीच व्यथा आहे. "शेततळं भरावं की मालाला पाणी द्यावं हेच समजंना. शेततळ्यासाठी दीड लाख रुपये खिशातून घातलं. आता हे पैसे भरून कसे निघणार डोकंच काम करत नाही. यंदा शेततळं तयार केलं. बारा परस असलेली विहीर शेतात हाय. सगळं पाणी मका, तूर, बाजरी, मालाला दिलं. आता शेततळं 30 फुटांचं फक्त 5 पाच फूट भरलं...'' दुष्काळाचे चटके बसू लागल्याने पळसकर खिन्न होऊन सांगत होते. 

पाच एकर शेतासाठी अर्धा एकरात याच वर्षी शेततळे तयार केले. शासनाकडून त्यांना दोन लाख रुपये अनुदान मिळाले. त्यांनी खिशातून दीड लाख रुपये घातले. या वर्षी शेततळेही तयार झाले; मात्र पाऊसच नसल्याने खरिपाच्या पिकांना पाणी द्यावं की शेततळं भरून घ्यावं अशा स्थितीत शेतकरी अडकले. त्यांनी कपाशी, मका, बाजरी, तुरीला पाणी देणे पसंत केले. काही प्रमाणात ही पिकं आली; मात्र शेततळी ही तळालाच राहिली आहेत. 

दीड लाख रुपये कसे भरून काढू? 
शेततळं बांधल्याने पहिल्या वर्षी चांगलं पीक घेता येईल असं वाटलं होतं. भाजीपालासुद्धा करता येईल असा विचार केला होता; मात्र आता आहे ती पिकंसुद्धा वाचविणे अवघड झाले. अर्ध्या एकरातील 30 फुटांचं शेततळं फक्त पाच फूट भरलं. या पाच फूट पाण्याचा काही उपयोग नाही. तेही उन्हाने उडून चालले. 
- रामेश्‍वर पळसकर (शेतकरी) 

डाळिंब जगविण्याची चिंता 
मी अर्धा एकरमध्ये 30 फुटांचे शेततळे या वर्षी तयार केले. लाख, दीड लाख रुपये खर्च झाले. काही प्रमाणात शेततळं भरलं; पण विहिरीला पाणी नाही. त्यामुळे माझ्याकडील डाळिंबाची बाग जगविण्याची चिंता आहे. शेतात टोमॅटो आहे; पण त्याला भावच नसल्याने ते सडताहेत. आता पाऊस आला तर शेततळं भरेल का, याची चिंता आहे. 
- अरविंद पळसकर (शेतकरी)

"शेततळं फायद्याचं असलं तरी यंदा शेततळ्यात पैसे टाकल्याने गोत्यात आलो. 1 लाख 60 हजार रुपये खर्च केले. बारा एकर जमिनीत चिपाटं झालेली थोडीशी बाजारी, मका हाती लागली. आता तूर, कपाशी सगळी गेली. कांदे लावण्यासाठी सरी तयार करून ठिवल्या; पण पाणीच नसल्याने रोप वाळूनं गेली. आता तर पाणी नाही अन्‌ पिकंही नाही.'' 
- किशोर जाधव (शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com