शेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून

hingoli photo
hingoli photo

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर बाजारपेठ व सर्वत्र ठप्प झालेले व्यवहार पाहता तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या टरबूज पिकाला आता घाऊक खरेदीदार भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून या काढणीस आलेल्या टरबूज पिकाचे नेमके काय करावे, या विवंचनेत सापडला आहे.

कोरोना आजाराची पार्श्वभूमी पाहता देशभरात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील उलढाल मंदावल्या गेली आहे. याचा थेट परिणाम विविध क्षेत्रांतील व्यावसायिक व कामगारांना सहन करावा लागत असतानाच शेतकरी वर्गालाही आता याचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे.

चार महिन्यांमध्येच भरघोस उत्पादन

मागील काही वर्षांपासून तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हंगामी पीक म्हणून टरबूज शेतीकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यातही हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना चार महिन्यांमध्येच भरघोस उत्पादन होऊन बऱ्यापैकी आर्थिक लाभ होत असल्याचे पाहून पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी टरबूज शेतीला प्राधान्य दिले होते.

टरबूज विक्रीमधून मिळविले उत्पन्न

तालुक्यातील सांडस येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी टरबूज विक्रीमधून मिळविलेले उत्पन्न पाहता विनायक धावंडकर, देवराव निरगुडे, सुनील निरगुडे, चंद्रकांत होडबे, साहेबराव होडबे ,मुकूंदराव होडबे, तुळशिराम वाघमारे यांच्यासह शेतकऱ्यांनी एक ते दीड एकरवर टरबूज पिकाची लागवड केली होती. आतापर्यंत त्यांनी या पिकावर प्रतिएकरी ७५ हजार ते एक लाख रुपयांचा खर्च केला आहे. आता हे पीक काढणीस आले आहे.

ठोक खरेदीदार व्यापाऱ्यांची पाठ

येत्या दहा ते पंधरा दिवसांत कुठल्याही परिस्थितीत हे पीक काढावे लागणार आहे. मात्र, बंद असलेली बाजारपेठ व जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर टरबूज पिकाला ठोक खरेदीदार व्यापारीच भेटत नसल्यामुळे हे टरबूज उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाले आहेत.

केलेला खर्च आता वाया जाणार

शेतामधील टरबूज पीक काढणीस आल्यानंतरही खरेदीदार व्यापारी टरबुजांची ठोक खरेदी करण्यास तयार नसल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आता घाम फुटला आहे. पीक घेण्यासाठी मागील काही महिन्यांपासून घेतलेली अहोरात्र मेहनत व केलेला खर्च आता वाया जाणार, या चिंतेत टरबूज उत्पादक शेतकरी सापडले आहेत. टरबुजाचे पीक ठराविक कालावधीत काढले नाही तर हे हातचे जाणार हे निश्चित झाले आहे.

कवडीमोल भावाने विक्री

काढणीस तयार झालेल्या टरबूज पिकाला ठोक खरेदीदार व्यापारी भेटत नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी टरबुजांची तोडणी करत एक दिवसाआड भरणाऱ्या शहरातील भाजीमंडईमध्ये टरबूज विक्रीसाठी ठेवण्याचा पर्यायही निवडला आहे. मात्र, टरबूज पिकाला भाजीमंडईमध्येही उठाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कवडीमोल भावाने टरबुजांची बिटमध्ये विक्री करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

खरेदीदारांकडून प्रतिसाद मिळेनात

दीड एकरावर टरबुजाची लागवड केली आहे. हे पीक आता काढणीस तयार झाले असून कोरोना आजारामुळे बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे टरबूज पिकाच्या ठोक खरेदीदारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असून टरबूज लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
-विनायक धावंडकर, शेतकरी, सांडस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com