इसापूर धरणाच्या पाण्याने मिळाला दिलासा... कुठे वाचा

girgaw talav
girgaw talav

गिरगाव (जि. हिंगाली) : माळवटा (ता. वसमत)  येथून वाहनाऱ्या आसना नदीला इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे माळवटासह मुरुंबा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे बंधारा भरला असून पाणीपातळीत वाढ झाली आहे.  

 माळवटा गावाजवळून आसना नदी वाहते. या नदीपात्रात गावाजवळ बंधारा उभारण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने गावात पाणीटंचाई जाणवत होती. तसेच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आसना नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती.

पाणी पातळीत झाली वाढ

 त्‍याप्रमाणे आसना नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीवर उभारलेला बंधारा पाण्याने भरला आहे. बंधाऱ्यात पाणीसाठा झाल्याने गाव व परिसरातील विहीरी, हातपंपाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील माळवटासह मुरुंबा गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

पाणीटंचाई दूर होण्यास मदत

 तसेच जनावरासह वन्यप्राण्यांना देखील या पाण्याचा उपयोग होणार आहे. बंधाऱ्यात साठलेले पाणी जवळपास महिनाभर साचून राहते. इसापूरच्या कालव्यातून आसना नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे सरपंच विठ्ठल लडके, उपसरपंच गंगाधर व्हंडराज, ग्रामसेवक गोपीनाथ इंगोले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.


दोन तलाव भरले तुडुंब

गिरगाव : वसमत तालुक्‍यातील गिरगाव येथून जाणाऱ्या इसापूर धरणाच्या कालव्याला काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी येथे असणाऱ्या दोन तलावांत जमा करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

पाच एक्कर जागेवर दोन गाव तलाव 

गिरगाव परिसरातून इसापूर धरणाचा कालवा जातो. गावात हफेजवली दर्गाह व नवीन आबादी येथे पाच एक्कर जागेवर दोन गाव तलाव आहेत. या तलावात कालव्याचे सुटलेले पाणी आणता येते. कालव्याला पाणी सोडल्यानंतर पाण्याची साठवण तलावात केली जाते. त्यामुळे गावातील विहीर, बोअरवेल, हातपंपाच्या पाणी पातळीत वाढ होते.

जलवाहिन्यांद्वारे होणार पाणीपुरवठा

 काही दिवसांपासून या भागातील पाण्याची पातळी कमी झाली होती. आता इसापूर धरणाचे पाणी येथील तलावात जमा झाले आहे. तलाव तुडुंब भरल्याने पाणी पातळी वाढीस मदत झाली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या जलवाहिन्यांद्वारे नळाला पाणीपुरवठा केला जणार आहे. दरवर्षी इतर गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतो.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

 परंतु, गिरगाव येथे दोन तलाव असल्यामुळे पाणीटंचाई जाणवत नाही. आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून दोन्ही तलाव तुडुंब भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यासाठी सरपंच मारोतराव कुंभारकर, ग्रामसेवक आर. एम. खंदारे, कर्मचारी ज्ञानेश्वर डोके, शिवाजी भोसले, नामदेव नादरे, शेख वाहेद, गौतम दवणे, अमोल हनुमंते आदींनी दोन्ही तलाव भरण्यासाठी पुढाकार घेतला होता.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com